पुणे : जी-20 प्रतिनिधींना देणार आषाढीवारीची माहिती; विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे : जी-20 प्रतिनिधींना देणार आषाढीवारीची माहिती; विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पालखी सोहळ्यात राज्यभरातून आलेल्या वारकर्‍यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. निर्मल आणि हरित वारीवर भर देऊन त्यासाठी सेवाभावी संस्थांची मदत घेण्यात येत आहे. जी-20 बैठकीसाठी 150 पेक्षा अधिक प्रतिनिधी यादरम्यान पुण्यात मुक्कामाला असणार आहेत. या प्रतिनिधींना राज्याच्या या समृद्ध सांस्कृतिक परंपरेची माहिती देण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आषाढी एकादशी यात्रा पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, कोल्हापूर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुण्याचे सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक, सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार आदी उपस्थित होते.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत आणि निर्मल व हरित वारीसोबत हा सोहळा वारकर्‍यांसाठी आनंददायी होईल, यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे निर्देश राव यांनी दिले. तसेच, पालखी मार्ग आणि पालखीतळावरील विविध सुविधांसाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.

रस्ते दुरुस्ती, सपाटीकरण, अतिक्रमण काढणे, वारकर्‍यांना देण्यात येणार्‍या सुविधांबाबतही आवश्यक कार्यवाही करण्यात आली आहे. पुणे जिल्हा प्रशासनाने वारीच्या नियोजनाची माहिती देण्यासाठी मोबाईल अ‍ॅपचा उपयोग करावा, अशी सूचना त्यांनी दिली. वारकर्‍यांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

जयवंशी म्हणाले, 'नीरा नदीवरील पुलाच्या दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. पालखी मार्गावर मदत केंद्र उभारण्यात येत आहे. पालखीतळावरील आवश्यक सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे. पालखी मार्गावरील रस्ते दुरुस्ती आणि स्वच्छता, तसेच आरोग्य सुविधांबाबत नियोजन करण्यात आले आहे.'

अडीच हजार तात्पुरती शौचालये

या वर्षी 2 हजार 700 तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात येणार आहे. स्वच्छतेसाठी कर्मचार्‍यांची नियुक्ती असेल. वैद्यकीय उपचारासाठी रुग्णवाहिका, मोटारसायकलवर आरोग्यदूतांची नेमणूक आणि पुरेशा प्रमाणात वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात येतील. पिण्याच्या पाण्याचे 70 टँकर उपलब्ध करून देण्यात येतील. निर्मल वारीसाठी आवश्यक उपाय केले जातील, असे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

कर्मचार्‍यांना यशदामध्ये प्रशिक्षण

पालख्याच्या मुक्काम आणि रिंगणाच्या ठिकाणी आवश्यक सुविधा करण्यात आली आहे. घटना प्रतिसाद प्रणाली कार्यरत करण्यात आली असून, 31 आपत्ती प्रतिसाद केंद्र उभारण्यात येणार आहेत. नियोजनासाठी 9 स्वयंसेवी व सामाजिक संस्थांचे 1 हजार 900 स्वयंसेवक मदतीला असतील. संपूर्ण सोहळ्यादरम्यान 25 हजार 500 अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. या सर्वांना यशदामार्फत प्रशिक्षण देण्यात येईल, असे सोलापूरचे अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news