भवानीनगर : आता कोठे धावे मन । तुझे चरण देखी लिया ॥ भाग गेला शिन गेला । अवघा झाला आनंद ॥
संत श्रीतुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या मानाच्या अश्वाचे डोळ्याचे पारणे फेडणारे पहिले गोल रिंगण बेलवाडी (ता. इंदापूर) येथे सोमवारी (दि. 8) सकाळी भक्तिमय वातावरणात पार पडले.
पालखी सोहळा रिंगण परिसरामध्ये आल्यानंतर तोफांची सलामी देण्यात आली. सुरुवातीला चौघड्यासह पालखी रथाने रिंगणात प्रदक्षिणा पूर्ण केली. त्यानंतर मचाले कुटुंबाच्या मेंढ्यांचे रिंगण पार पडले. त्यानंतर भगव्या पताका घेतलेल्या वारकर्यांनी डोक्यावर हंडा व तुळस घेतलेल्या महिला वारकर्यांनी, वीणेकरी, पखवाज व टाळकर्यांनी पालखीभोवती प्रदक्षिणा घातली.
त्यानंतर अश्वाचे पूजन करून पालखीच्या मानाच्या अश्वाच्या रिंगणाला ’ज्ञानोबा तुकाराम’च्या जयघोषात सुरुवात झाली. अश्वाने पालखीला तीन प्रदक्षिणा पूर्ण करून पालखीचे दर्शन घेतले. हा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला. रिंगण सोहळा पार पडल्यानंतर रिंगण परिसरात अश्वाची चरणधुळ घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. हा सोहळा सुमारे एक तास सुरू होता.
सणसर (ता. इंदापूर) येथील मुक्कामानंतर संत श्रीतुकाराम महाराज पालखी सोहळ्याने सोमवारी सकाळी सात वाजता अंथुर्णे मुक्कामाकडे प्रस्थान ठेवले. जाचकवस्ती खाराओढा येथून पालखी सोहळा बेलवाडी येथे पोहोचला. ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले.
तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रिंगण सोहळा परिसरातील व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले होते. विसाव्यानंतर दुपारी पालखी सोहळ्याने अंथुर्णे मुक्कामाकडे प्रस्थान केले.
हिराबाई हरिभाऊ देसाई विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पालखी रिंगण परिसराची स्वच्छता केली होती. मेगडंबरीपर्यंत रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. परशुराम घाडगे यांनी मेघडंबरी समोर आकर्षक रांगोळी काढली होती. अनेक वारकर्यांनी त्यासोबत सेल्फी घेतला.