कसबा पेठ; पुढारी वृत्तसेवा: गणेशोत्सवाच्या काळात निर्माल्य गोळा करण्याची तसेच हौदांमध्ये गणेशमूर्ती विसर्जनाची व्यवस्था पुणे महापालिकेकडून केली जाते. मात्र, नवरात्राच्या काळात बसणार्या घटाचे निर्माल्य गोळा करण्याची कोणतीही व्यवस्था महापालिकेने न केल्याने मुठा नदी घाट परिसरातील ओंकारेश्वर घाट, सिद्धेश्वर घाट परिसरात गुरुवारी (दि. 6) मोठ्या प्रमाणात निर्माल्य टाकल्याचे दिसून आले. दसर्याच्या दुसर्या दिवशी नागरिक घटाचे साहित्य नदीपात्रात किंवा नदीत आणून सोडतात, हे माहीत असूनसुद्धा महानगरपालिकेच्या कर्मचार्यांकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आली नव्हती.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पालिकेचे आरोग्य कर्मचारी याबाबत बघ्याची भूमिका घेत होते. त्यामुळे झालेल्या प्रदूषणाने नदीपात्रात लगतच्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला. नागरिकांच्या तक्रारीनंतर गुरुवारी, शुक्रवारी सकाळी निर्माल्य गोळा करण्यात आले. या वर्षीही मुठा नदीच्या घाटावर कोणत्याही प्रकारचे निर्माल्य कलश, प्रत्येक ठिकाणी कंटेनर तसेच पालिकेचे कर्मचारी दिसत नसल्याने नदीपात्रातून येणारे-जाणारे नागरिक थेट नदीवर जाऊन प्लास्टिक पिशवीतून घटाचे साहित्य व निर्माल्य नदीत सोडताना दिसते होते. टिळक पुलावर तर गुरुवारी सकाळच्या वेळीस घटाच्या साहित्यांचे ढीग साठले होते.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही घटाचे साहित्य विसर्जन करण्यासाठी मुठा नदीपात्रानजीकच्या शनिवार पेठ, नारायण पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, पुलाची वाडी, शिवाजीनगर, भांबुर्डा परिसरातील नागरिक सकाळपासून घट विसर्जन करण्यासाठी तसेच घटाचे साहित्य, निर्माल्य मुठा नदीपात्रात सोडण्यासाठी नदीच्या दोन्ही बाजूला येताना दिसत होते. काही जण सिद्धेश्वर घाटाच्या कॉजवेवर बसून नदीत घट, निर्माल्य सोडताना दिसले तर काही नागरिक नदीकाठच्या पायर्यांवर घटाचे साहित्य ठेवून जाताना दिसत होते.
मुठा नदीकिनारी साठलेली हारफुले, परडी, नारळ, पाने, पत्रावळी, मातीचा घट, घटाची माती, फळे, कापूस, दोरे, आपट्याची पाने, निर्माल्या नदीकाठी ठिकठिकाणी पडल्याने नदीकिनारी अक्षरश: ढीग साठले होते. तसेच मुठा नदीच्या पाण्यावर वाहणारी फुले, नारळ, पाने, फळे, नदीच्या पाण्यांबरोबर वाहून जातानाचे चित्र ओंकारेश्वर पुलावरून दिसत होते.
दोन क्षेत्रीय कार्यालयांच्या कात्रीत अडकला घाट
मुठा नदीपात्राची एक बाजू ओंकारेश्वर घाट परिसर कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येते, तर दुसरी बाजू सिद्धेश्वर घाट परिसर घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत येते. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार शिवाजीनगर भांबुर्डाजवळील वृद्धेश्वर-सिद्धेश्वर चौपाटीवर नेहमीच चहा-कॉफीचे कप, दारूच्या बाटल्या, सिगारेटचे तुकडे, पेपरडिशचे ढीग कायमच घाटावर पडलेले असतात. पालिका कर्मचार्यांना सफाईची विचारणा केली असता, हा भाग आमचा नाही, असे उत्तर मिळते. त्यामुळे या घाटावरील कचरा नक्की काढायचा कुणी? हा प्रश्न येणार्या-जाणार्यांना पडतो.
टिळक पूल येथे एक कंटेनर ठेवला आहे. परिसर स्वच्छ केला तरी नागरिक पुन्हा साहित्य आणून टाकत असतात. महापालिकेच्या वतीने दरवर्षी आवाहन करण्यात येते. या वर्षी 80 टक्के नागरिक कंटेनरमध्ये घट, निर्माल्य आणून टाकत आहेत. मात्र, 20 टक्के नागरिक धार्मिक भावनेतून घट नदीत विसर्जन करताना दिसत आहेत.
नंदकुमार महांगरे, आरोग्य निरीक्षक, कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय