

केडगाव; पुढारी वृत्तसेवा : पुण्याच्या कसबा पोटनिवडणुकीत भाजपला आपला पराभव दिसू लागल्याने प्रचारासाठी आजारी आलेल्या खासदार गिरीश बापट यांना आणावे लागत आहे, अशी टीका शिवसेनेचे जिल्हा संघटक आणि माजी मंत्री आमदार सचिन अहिर यांनी केली. केडगाव येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
आ. अहिर म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने राजकारणासाठी अत्यंत खालची पातळी गाठलेली आहे.
राजकारणात वर्चस्व राहावे, यासाठी कधीही सीबीआय, ईडी यांच्यामार्फत राजकीय दबावतंत्र निर्माण करण्याचे काम केले आहे. आज खासदार बापट यांचा कसबा मतदारसंघ असून, त्यांच्यावर त्यांची पकड मजबूत असल्याने त्यांचा वापर करण्यासाठी थेट रुग्णालयातून त्यांना प्रचारयंत्रणेत आणले गेले आहे. असे पहिल्यांदाच झाले असे नाही
. त्यांनी या अगोदर देखील रुग्ण असलेले आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनाही रुग्णालयातून मुंबईत मतदानासाठी आणले होते, अशी टीका केली. शिवसेनेशी युती केलेल्या वंचित बहुजन आघाडीने चिंचवड येथे शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांना निवेदन काढून पाठिंबा दिला आहे, असे विचारताच याबाबत मला माहिती नाही. याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असे सांगितले.