शिवापूर टोलनाक्याबाबत अधिकार्यांची उडवाउडवीची उत्तरे
नसरापूर : पुढारी वृत्तसेवा : खेड-शिवापूर टोलनाका हटावसाठी कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनाला सर्वस्तरातून प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने घेतलेल्या बैठकीत कृती समितीने विचारलेल्या प्रश्नांना अधिकार्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. काही प्रश्नांवर अधिकारी निरुत्तर झाले होते. टोल स्थलांतरासाठी 2 एप्रिल रोजी जनआंदोलन करणारच असा पवित्रा घेताच जिल्हाधिकार्यांच्या समवेत बैठक घेऊ, असे सांगत अधिकार्यांनी चर्चा आटोपती घेतली.
टोलनाका हटाव कृती समितीच्या आंदोलनबाबत प्रशासनाने राजगड पोलिस ठाण्यात बैठक आयोजित केली होती. या वेळी हवेलीचे प्रांताधिकारी संजय आसवले, भोर प्रांताधिकारी राजेंद्रकुमार कचरे, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील, तहसीलदार सचिन पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संचालक संजय कदम, पोलिस निरीक्षक सचिन पाटील, कृती समितीचे निमंत्रक ज्ञानेश्वर दारवटकर, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत कृती समितीचे निमंत्रक ज्ञानेश्वर दारवटकर म्हणाले की, जोपर्यंत टोल हटणार नाही तोपर्यंत टोल भरणार नाही. लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या जागेवर टोल हलवावा. प्रांताधिकारी आसवले यांनी, खेड-शिवापूर टोलनाक्यावर योग्य मार्ग काढला गेला पाहिजे. आंदोलन करताना कोणताही अनुचित प्रकार घडता कामा नये, असे सांगितले.