पुणे, पुढारी वृत्तसेवा: देशभरातील राज्यांतर्गत नद्या जोडण्यासाठी 31 नद्यांचा नदीजोड प्रकल्प तयार करून सर्व राज्यांना पाठविण्यात आला आहे. त्यात 'इंट्रा स्टेट रिव्हर कनेक्टिव्हिटी'चा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. पुण्यातील मुळा-मुठा नदीच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या अभ्यासासाठी या परिषदेत तज्ज्ञ आल्याची माहिती केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी सोमवारी (दि. 13) पत्रकारांना दिली.
केंद्र व पुणे महापालिकेच्या वतीने शहरात 'धारा 2023' या नदी विषयावर दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन शेखावत यांच्या हस्ते झाले. या वेळी एनआययूएचे संचालक हितेश वैद्य, क्लीन गंगा राष्ट्रीय मिशनचे महासंचालक जी. अशोककुमार व महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांची प्रमुख उपस्थिती होती.
पत्रकारांशी संवाद साधताना शेखावत म्हणाले, 'नदी सुधारणा, जल व्यवस्थापन, जल प्रक्रिया, भूजल पुनर्भरण, भूजल व्यवस्थापन, शुध्दीकरण व सांडपाणी प्रक्रिया या विषयांवर दिवसभरातील चर्चासत्रात चर्चा झाली. देभरातील 44 महापालिका आयुक्तांसह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ, शास्त्रज्ञ व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यात सहभागी झाले होते. 2025 पर्यंत या प्रकल्पावर काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, 2047 पर्यंत प्रत्येकाला पाणी कसे देता येईल? याचे सूक्ष्म नियोजन केलेले आहे. जगात भारत एकमेव देश आहे, जो 240 दशलक्ष यूएस डॉलरचा खर्च पाणी योजेनवर करीत आहे. यामध्ये नदीचे शुध्दीकरण, जमिनीवर पडणारे पाणी रोखणे, नदीत जाणारे प्रदूषित पाणी, यासह अकरा मुद्द्यांवर काम सुरू आहे. याशिवाय अमेरिका व चीनच्या तुलनेत भारतात भूगर्भातून सर्वांत जास्त पाणी उपसले जाते. हे रोखण्यासाठी पाण्याचे पुनर्भरण करण्यावर विशेष लक्ष दिले जात असल्याची माहिती शेखावत यांनी दिली.