पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोरोना महामारीमुळे दोन वर्षांनंतर प्रथमच मोठ्या उत्साहात शिवजन्मभूमीत साजरा होत असलेला शिवजयंती महोत्सव, राज्य सरकारने किल्ले शिवनेरीवर येणार्या शिवभक्तांसाठी दिलेली टोलमाफी, 'हिंदवी स्वराज्य महोत्सवा'निमित्त सलग तीन दिवस असलेली विविध कार्यक्रमांची रेलचेल, यामुळे संपूर्ण राज्यातून प्रचंड संख्येने शिवभक्त शिवजन्मभूमीत दाखल झाले. यामुळे किल्ले शिवनेरीवर शिवभक्तांची अभूतपूर्व गर्दी झाली. ही गर्दी नियंत्रित करणे काही वेळ पोलिस यंत्रणेलाही कठीण झाले. परंतु, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अधिकचा पोलिस बंदोबस्त तैनात केल्याने चेंगराचेंगरीचा प्रसंग थोडक्यात टळला.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्मोत्सवानिमित्त रविवारी (दि.19) शिवजन्मभूमीत चैतन्य संचारले होते. महाराष्ट्र शासनाच्या वतीने यंदाचा शिवजंयती महोत्सव 'हिंदवी स्वराज्य' महोत्सव म्हणून साजरा केला जात आहे. यासाठी संपूर्ण राज्यात जाहिराती करून या संदर्भात माहिती देण्यात आली.
या शिवाय किल्ले शिवनेरीवर येणा-या शिवभक्तांना दिलेली टोल माफी व शिवजयंतीनिमित्त जुन्नर शहर आणि परिसरात शिवजन्मोत्सव सोहळा, शिव वंदना, महाशिव आरती, बैलगाडा शर्यती अशा विविध कार्यक्रमांच्या रेलचेलीमुळे राज्यभरातील हजारो शिवभक्त जुन्नर तालुक्यात दाखल झाले. शनिवारी (दि. 18) रात्री पासूनच शिवनेरी किल्ल्यावर शिवभक्तांची गर्दी सुरू होती.
रविवारी दुपारी एकाच वेळी सकाळी कार्यक्रमासाठी गेलेल्या लोकांची खाली येण्याची व खालून वर जाणा-या लोकांची प्रचंड गर्दी सुरू झाली. शिवनेरीवर जाण्यासाठी हत्ती दरवाजा ते धान्य कोठार यादरम्यानचा रस्ता अरुंद असल्याने प्रचंड गर्दी होऊन चेंगराचेंगरी झाली. या गर्दीत मोठ्यांसह लहान मुलांची, महिलांची संख्यादेखील अधिक होती. काही काळ पोलिस प्रशासनाला गर्दी नियंत्रण करणे कठीण झाले. शेवटी अधिकचा पोलिस फोर्स व दो-या लावून, काही काळ लोकांना थांबवून गर्दी नियंत्रित करण्याचा प्रयत्न करण्यात आला, यामुळे मोठा अनर्थ टळला.