

पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020' च्या अनुषंगाने सुकाणू समितीने सांगितलेली प्रत्येक गोष्ट करा, प्रत्येक टास्क पूर्ण करा व 2023- 24 या शैक्षणिक वर्षासाठी तयार राहा, असे आवाहन उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या सभेदरम्यान राज्यातील विद्यापीठांच्या प्र-कुलगुरू व अधिष्ठात्यांना केले.
विद्यापीठात आयोजित सुकाणू समितीच्या कार्यशाळेत ते बोलत होते. या वेळी राज्यभरातील विद्यापीठांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी ऑनलाईन उपस्थिती लावत समितीचे अनेक मुद्दे ऐकून घेतले तसेच काही मार्गदर्शक सूचनाही केल्या. या कार्यशाळेत समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर यांच्यासह विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्यासह ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. संजय धांडे व विद्यापीठातील अधिष्ठाता उपस्थित होते. या वेळी बोलताना डॉ. संजय धांडे म्हणाले, 'ज्यावेळी देश स्वतंत्र झाला, त्यावेळी लोकसंख्या 40 कोटी होती.
आता ती 140 कोटींवर आली आहे. तरी आपली शिक्षणव्यवस्था तीच आहे. त्यामुळेच त्यावर भारही मोठ्या प्रमाणात आहे. खरे तर प्रत्येक जिल्ह्यासाठी एक विद्यापीठ असायला हवे. या कार्यशाळेत सर्व विद्यापीठांच्या प्रतिनिधींनी शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी धोरणाच्या अनुषंगाने काय तयारी केली, याबाबत सादरीकरण केले. तसेच आर. डी. कुलकर्णी यांनी देखील अंमलबजावणीबाबत सादरीकरण केले. यावेळी विद्यापीठ प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना समितीकडून उत्तरे देण्यात आली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची तयारी पूर्ण!
विद्यापीठांच्या सादरीकरणात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानेही आपले सादरीकरण केले. या वेळी डॉ. सोनवणे यांनी सांगितले की, 'शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या अनुषंगाने आमची सर्व तयारी झाली आहे. अॅकॅडमिक क्रेडिट बँकसाठी 4 लाख 31 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, 84 देशांसोबत शैक्षणिक कार्यक्रमातून जोडले गेलो आहोत. डीजी लॉकरवर नऊ लाख पदव्या अपलोड केल्या आहेत.'
कार्यशाळेतील ठळक मुद्दे
1) सर्व विद्यापीठांच्या माहितीसाठी एफएक्यू करणार.
2) कामाचा आवाका जाणून घेण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर सर्व विद्यापीठांमध्ये उपक्रम राबविणार.
3) अॅकॅडमिक कॅलेंडर तयार करणार.
4) पुढील सभा जळगाव येथे आयोजित करणार.
मूळ भारतीय शिक्षण हे सर्वसमावेशक होते. आता तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण पुन्हा त्या मूळ मार्गाकडे मार्गक्रमण करत आहोत. या धोरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वतःचे व्यक्तिमत्त्व स्वतः तयार करण्याची संधी मिळाली आहे. एका ठराविक चौकटीतील अभ्यास न स्वीकारता आपल्याला हवे ते स्वीकारण्याची, निरंतर शिक्षणाची ही प्रक्रिया आहे.
– डॉ.अविनाश धर्माधिकारी,
शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक