

पुणे: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये (पीडीसीसी) सुमारे एक हजार 80 पदांसाठीची भरती होणार असून, त्यातील पहिल्या टप्प्यात 356 पदांची प्रक्रिया सुरू आहे. तर, दुसऱ्या टप्प्यात 434 क्लार्क आणि त्यानंतर 289 शिपाई व ड्रायव्हर ही पदे भरली जाणार आहेत.
शासन निकष आणि गुणवत्तेनुसार ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे सूतोवाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. जिल्ह्यातील शेतकरी सभासदांच्या मुलांना प्राधान्य मिळण्यासाठी शक्य तेवढी मदत करू. मात्र, त्यामध्ये काही गडबड झाल्याचे समजल्यास ते अजिबात खपवून घेतले जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. (Latest Pune News)
येथील अल्पबचत भवनात शुक्रवारी (दि. 26) पीडीसीसी बँकेची 108 वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, कृषिमंत्री आणि बँकेचे संचालक दत्तात्रय भरणे, दिलीप वळसे पाटील, रमेश थोरात, दिलीप मोहिते पाटील, ॲड अशोक पवार, रेवणनाथ दारवटकर, माऊली दाभाडे, प्रवीण शिंदे, सुरेश घुले, आप्पासाहेब जगदाळे, विकास दांगट, रणजित तावरे, भालचंद्र जगताप, प्रदीप कंद, निर्मला जागडे, पूजा बुट्टे पाटील, सहकारचे पुणे विभागीय सहनिबंधक योगिराज सुर्वे, जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप, माजी आमदार अतुल बेनके व मान्यवर उपस्थित होते.
वार्षिक सभेत संस्था प्रतिनिधी व सभासद शेतकऱ्यांनी विविध मागण्या केल्या होत्या. त्या सर्व मुद्द्यांचा धागा पकडत पवार म्हणाले, शासनाचा सहकार विभाग, नाबार्ड आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या निकषांनुसार व गुणवत्तेवर होईल, हे सांगत असताना विकास सोसायट्यांच्या केडरमधील सचिवांची 25 हजार रुपयांची बोनसची मागणी पवार यांनी मान्य केली.
तसेच बँकेच्या संचालक मंडळाने तसा ठराव करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. जिल्हा बँकेच्या स्थावर मालमत्ता वाढीबाबतही पवार यांनी माहिती देतानाच बँकेची उलाढाल 26 हजार कोटींवर पोहोचल्याबद्दल अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाचे अभिनंदन केले.
या वेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी 2030 पर्यंत बँकेचे भागभांडवल 30 हजार कोटींची करण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे नमूद करीत वार्षिक अहवाल सादर केला. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांनी प्रास्तविक, सूत्रसंचालन सरव्यवस्थापक संजय शितोळे तर उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांनी आभार मानले.
बँकेच्या 2400 सभासदांसाठी व्याजाचा नऊ कोटींचा बोजा अशक्य जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत पीककर्ज शून्य टक्के व्याजदराने दिले जाते आणि असे कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 2 लाख 88 हजार व रक्कम 2400 कोटी आहे.
त्यासाठी बँक नऊ कोटी रुपयांचा व्याजाचा बोजा सहन करते. मात्र, तीनवरून पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज केवळ 2400 सभासद शेतकरी घेतील आणि त्यासाठी नऊ कोटी रुपयांचा व्याजाचा बोजा घेणे अशक्य असल्याचे नमूद करून शेतकऱ्यांनी आपले खातेफोड करण्याचा सल्ला त्यांनी दिला. जिल्हा बँकेच्या वार्षिक सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार. या वेळी उपस्थित बँकेचे संचालक मंडळ.