शिवनगर; पुढारी वृत्तसेवा: माळेगाव साखर कारखाना राज्यातील सहकाराला दिशा देणारा कारखाना आहे. कारखान्याच्या विस्तारीकरणानंतर मागील गाळप हंगामात उच्चांकी गाळप झाले आहे. माळेगाव कारखान्यावर सभासदांसह गेटकेनधारकांचा विश्वास आहे. त्यामुळे अजित पवारांनी माळेगाव कारखान्याच्या उसाची चिंता करू नये, तसेच सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील दहा गावे जोडण्याचा प्रयत्न केल्यास कदापि सहन करणार नाही, अशा इशारा कारखान्याचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ संचालक रंजन तावरे यांनी दिला आहे.
तावरे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडताना स्पष्ट केले की, माळेगाव कारखान्याचे व सोमेश्वर साखर कारखान्याचे सत्ताधारी संचालक मंडळ विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अधिपत्याखाली काम करत आहे. याचाच फायदा घेत अजित पवार दोन्ही कारखान्यांवरील सत्ताधारी संचालक मंडळावर दबाव टाकून केवळ राजकारणासाठी एका कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील गावे दुसर्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जोडण्याचा डाव करीत आहेत.
सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील या दहा गावांतील सभासदांची इच्छा नसताना आणि माळेगाव साखर कारखान्याच्या 80 ते 90 टक्के सभासदांचा याला विरोध असताना माळेगाव साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्ताधारी संचालक मंडळाने गोंधळातच ही दहा गावे समाविष्ट करण्याचा निर्णय मंजूर झाल्याचे सांगून सभेतून पळ काढला. परंतु त्याच ठिकाणी आम्ही प्रतिसभा घेत याला नामंजूर म्हणत विरोध केला. असे असताना सत्ताधारी संचालक मंडळाने साखर आयुक्त कार्यालयाकडे दुसर्याच दिवशी प्रस्ताव मंजूर झाल्याचा अहवाल सादर केला आहे. मात्र याबद्दल आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत, असे तावरे यांनी स्पष्ट केले.
तथापि लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असते आणि याच बहुमताचा विचार करत तालुक्याचे प्रतिनिधी आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभासदांच्या मताचा आदर करत सत्ताधारी संचालक मंडळाला सदर दहा गावे माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रात घेऊ नयेत अशी सूचना करावी, असे मत तावरे यांनी व्यक्त केले. यावेळी संचालक अॅड. जी. बी. गावडे, शशिकांत कोकरे, राजेश देवकाते, चिंतामणी नवले, अॅड. श्याम कोकरे, युवराज तावरे, रणजित खलाटे, धनंजय गवारे, अॅड. रोहन कोकरे, भालचंद्र देवकाते, दत्तोबा सरगर, नितीन मदने आदी उपस्थित होते.
शुभकार्यात अडथळा करणार नाही
माळेगाव कारखान्याच्या गाळप हंगामाची सुरुवात जरी अजित पवार यांच्या हस्ते होत असली तरी कारखान्याच्या या शुभकार्यात काळे झेंडे किंवा इतर मार्गाने अडथळा आणणार नाही. कारण, माळेगाव कारखाना हे आमच्या लक्ष्मीचे मंदिर आहे. त्यामुळे अशा शुभकार्यात आमच्यामुळे गालबोट लागेल असे कृत्य आम्ही करणार नसल्याचे रंजन तावरे यांनी स्पष्ट केले.
अजित पवार यांनी शब्द पाळला नाही
कारखान्याच्या निवडणूक प्रचार सभेत अजित पवार म्हणाले होते की, कारखान्यात काम करणार्या कोणत्याही कामगारावर अन्याय करणार नाही. तथापि, निवडणूक झाल्यानंतर सत्तेत आलेल्या सत्ताधारी संचालक मंडळाने या कामगारांना कामावरून काढून टाकले. त्यामुळे अजित पवारांनी दिलेला शब्द पाळला नाही, असा आरोप रंजन तावरे यांनी करून याबाबत न्यायालयात दाद मागितली असल्याचे सांगितले.