

पुणे: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीवरून राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अपघाताच्या तपासाबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. “अजितदादांच्या अपघाताचे राजकारण करू नका. तपास यंत्रणांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यांना वेळ दिला पाहिजे,” असे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.
अजित पवार यांच्या विमान अपघाताला बराच कालावधी उलटूनही या प्रकरणात गुन्हा दाखल का झाला नाही, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला होता. अन्य प्रकरणांमध्ये तातडीने गुन्हे दाखल केले जातात; मग अजित पवार यांच्या अपघाताच्या तपासाबाबत अशीच तत्परता का दाखविली जात नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.
त्यामुळे या मुद्द्यावरून राष्ट्रवादीतील दोन्ही गटांमध्ये पुन्हा शाब्दिक संघर्ष निर्माण झाला आहे. यावर बोलताना सुनेत्रा पवार यांनी कुटुंबाच्या भावनांचा संदर्भ देत सुळे यांना प्रत्युत्तर दिले. अजितदादांच्या जाण्याचे दुःख माझ्या मुलांना आणि मला किती आहे, हे आमच्यापेक्षा अधिक कोणाला कळणार? त्यांच्या अपघाताचे राजकारण कोणीही करू नये.
अपघाताच्या चौकशीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. तपास लवकर पूर्ण व्हावा, अशी कुटुंबाचीही इच्छा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.