पुणे/हडपसर: समाविष्ट गावांमध्ये पेयजल, ड्रेनेज, रस्ते, अखंडित वीजपुरवठा अशा विविध समस्या आहेत. त्या प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत जाऊन सोडवल्या जातील. मी पुण्याचा पालकमंत्री असल्याने पुण्याचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार, अशी ग्वाही हडपसर येथे भरलेल्या ‘जनता दरबार’मध्ये देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येणाऱ्या महापालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे आक्रमक झाले आहेत. ‘जनसंवाद’ कार्यक्रमाच्या निमित्ताने थेट नागरिकांच्या दारात पोहचणार आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात हडपसर विधानसभा मतदारसंघातून शनिवारी (दि 13) झाली. राज्यभरात पुढील वर्षभर हा जनसंवाद कार्यक्रम राबविण्यात येणार असून, शक्यतो दर आठवड्याला एका मतदारसंघात त्याचे आयोजन केले जाणार आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून अजित पवार यांनी नागरिकांच्या विविध तक्रारी व समस्या ऐकून घेतल्या. (Latest Pune News)
या जनता दरबारात नागरिकांनी पायाभूत सुविधा, पाणीटंचाई, वीजपुरवठा, आरोग्य, वाहतूक व्यवस्था अशा अनेक विषयांवर नागरिकांनी आपली मते व तक्रारी मांडल्या. अजित पवार यांनी त्यातील अनेक समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. हडपसर मतदारसंघातून जवळपास तीन हजार तक्रारी या जनसंवाद उपक्रमाद्वारे नोंदविण्यात आल्या.
यावेळी मतदार संघाचे आमदार चेतन तुपे पाटील, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी,अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील, बी. पी. पृथ्वीराज, जिल्हा बँकेचे सुरेश घुले, मतदार संघाचे अध्यक्ष डॉ. शंतनु जगदाळे, अमर तुपे, संदीप बधे तसेच मतदार संघातील पदाधिकारी व माजी नगरसेवक, नगरसेविका आणि नागरिक उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, ’समाविष्ट गावातील पिण्याच्या पाण्याच्या ड्रेनेजच्या आणि रस्त्याच्या समस्या प्रामुख्याने नागरिकांनी मांडल्या. सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्यादेखील मोठ्या तक्रारी आहेत. शासन आणि नागरिक यांच्यातील मुख्य दुवा होऊन या तक्रारी सोडवण्यात येणार आहेत. राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून ही कामे करणे आमची जबाबदारी आहे. सरकारकडे असणाऱ्या बजेटचा विचार करून आम्ही ही कामे करू, यासाठी आमची टीम कार्यरत आहे.’
मी पुण्याचा पालकमंत्री; पुण्याचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार
मी पुण्याचा पालकमंत्री आहे. त्यामुळे मी पुण्याचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार आहे. मी इथे उपमुख्यमंत्री म्हणून बसलो आहे. हे सरकारचे काम आहे. सध्या नागरिकांचे प्रश्न सोडवत आहे. सगळे अधिकारी इथे आहेत, आम्हाला सगळ्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत. पालकमंत्री म्हणून माझ्यावर देखील जबाबदारी आहे, असे पवार यांनी सांगितले.