

11th admission second round
पुणे: राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता अकरावी प्रवेशासाठी दुसर्या फेरीचे कॅप व कोटाअंतर्गत प्रवेश जाहीर केले आहेत. अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरलेल्या दोन लाख 51 हजार 804 विद्यार्थ्यांना विविध कनिष्ठ महाविद्यालयांत त्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार प्रवेश जाहीर केले आहेत.
विद्यार्थ्यांना 18 ते 21 जुलैदरम्यान संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे अपेक्षित आहे, असे राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी स्पष्ट केले आहे. (Latest Pune News)
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबवली जात आहे. दुसर्या फेरीअंतर्गत विज्ञान शाखेसाठी एक लाख 29 हजार 35 विद्यार्थ्यांना महाविद्यालय जाहीर केले आहे. वाणिज्य शाखेच्या 69 हजार 442 विद्यार्थ्यांना, तर कला शाखेच्या 53 हजार 327 विद्यार्थ्यांना महाविद्यालय जाहीर झाले आहे.
पहिल्या फेरीतून आतापर्यंत पाच लाख सात हजार 288 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. दुसर्या फेरीतून केवळ दोन लाख 51 हजार 804 विद्यार्थ्यांना महाविद्यालय जाहीर झाले आहे. त्यामुळे दुसर्या फेरीअखेर केवळ सात ते साडेसात लाख विद्यार्थीच प्रवेश घेऊ शकणार आहेत.
राज्यात अकरावीसाठी महाविद्यालयांमध्ये 21 लाख 32 हजार 960 एवढी प्रवेश क्षमता आहे, तर अकरावी प्रवेशासाठी 16 लाख 25 हजार 672 एवढ्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे अजूनही लाखो विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विभागनिहाय महाविद्यालय जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी
अमरावती 21,104, छत्रपती संभाजीनगर 29,358, कोल्हापूर 18,768, लातूर 13,640, मुंबई 79,403, नागपूर 22,040, नाशिक 23,789, पुणे 43,702.