पुणे : पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. त्यानुसार सरकारने कार्यवाही सुरू केली आहे. मात्र, कायदेशीर कार्यवाहीसाठी पुरेसा वेळ देणे गरजेचे असून, तो आम्ही देऊ, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पुण्यात व्यक्त केले. देवेंद्र फडणवीस पुणे दौर्यावर आल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
मनोज जरांगे-पाटील यांनी दिलेल्या अंतिम मुदतीसंदर्भातील प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. कोणत्याही घटकावर अन्याय न करता मराठा आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार कटिबद्ध आहे. त्यानुसार सरकारने कार्यवाही सुरू केली असून, कायदेशीर कार्यवाहीसाठी आवश्यक तो वेळ देण्याची गरज आहे तसेच इतर मागासवर्गीय समाजाने (ओबीसी) कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
दोन समाज एकमेकांसमोर उभे राहू नयेत, यासाठी आमचा प्रयत्न आहे. दोन समाजात वाद होणार नाहीत, ही केवळ आमची जबाबदारी नाही तर ती प्रत्येक नेत्याची, प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी आहे. महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. ललित पाटील प्रकरणावरील प्रश्नावर फडणवीस म्हणाले, ललित पाटील प्रकरणात बरेच काही स्पष्ट झाले आहे. त्याला कोणी संरक्षण दिले, हे समोर आले आहे.
त्यामुळे विरोधकांना बोलायला जागा उरलेली नाही. या प्रकरणाची पाळेमुळे खूप खोलवर असून, वरवरची कारवाई उपयोगाची नाही. या प्रकरणाचे मूळ सूत्रधार आणि हे संपूर्ण रॅकेट शोधण्याची गरज आहे. तसे आदेशच आम्ही दिले आहेत, यातून बरीच मोठी साखळी बाहेर येईल, थोडा वेळ थांबा, असे सूचक विधानही त्यांनी केले.
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुणे पोलिसांचा येरवडा कारागृह मार्गावरील एक व्हिडिओ टि्वट केल्याच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, कोणीही तक्रार केली असली, तरी त्याची सत्यता पडताळली जाईल आणि कारवाई केली जाईल.
रक्तदान हे जीवनदान आहे. राज्यात अनेकदा रक्ताचा तुटवडा निर्माण होतो. त्या वेळी रक्तदाते शोधावे लागतात. त्यामुळे वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरासारखा लोकोपयोगी उपक्रम आयोजित करणे महत्त्वाचे आहे, असे मत फडणवीस यांनी भाजप प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला भेट दिल्यानंतर व्यक्त केले.
हेही वाचा