पुणे : परीक्षेमध्ये गैरप्रकार केल्यास कारवाई ; दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य मंडळाकडून शिक्षासूची

exam
exam

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी कोणताही गैरप्रकार केला तर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य मंडळाने शिक्षासूची तयार केली आहे. तसेच यंदा परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांवर अनेक बंधने राहणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
राज्य मंडळातर्फे बारावीची परीक्षा 21 फेब—ुवारी ते 1 मार्च 2023 या कालावधीत, तर दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत होणार आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षेसंदर्भातील विद्यार्थ्यांसाठीच्या सूचना राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी शिक्षासूची परिपत्रकाद्वारे मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.

त्यानुसार सकाळच्या सत्रात साडेदहा आणि दुपारच्या सत्रात अडीच वाजल्यानंतर परीक्षाकक्षात विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेवेळी गैरप्रकार केल्यास संबंधित विद्यार्थ्यांची संपादणूक रद्द करणे, पुढील परीक्षेसाठी प्रतिबंध करणे आणि पोलिसात गुन्हा दाखल करण्याची करणे अशी कारवाई करण्यात येईल. यासह अन्य सूचना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.
शक्य झाल्यास प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षासूचीची प्रत उपलब्ध करून द्यावी. विद्यार्थ्याची स्वाक्षरी घेऊन ती प्रत दप्तरी ठेवावी. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या प्रत्येक दिवशी आपले प्रवेशपत्र आणि ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. ओळखपत्र आणि प्रवेशपत्राची मागणी केल्यावर ते दाखविले पाहिजे, असे नमूद करण्यात आले आहे.

गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य मंडळाने विद्यार्थ्यांना काही सवलती दिल्या होत्या. त्यात शाळा-कनिष्ठ महाविद्यालयातच परीक्षा केंद्र, परीक्षेसाठी पंधरा मिनिटे ते अर्धा तास अतिरिक्त वेळ आदींचा समावेश होता. मात्र, यंदा नियमित पद्धतीने परीक्षा होणार असल्याने या सवलती रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्याने कोणती चूक केल्यानंतर त्यासाठी कोणती शास्ती लावावी यासंदर्भातील यादीच मुख्याध्यापकांना पाठविण्यात आलेली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news