भामा आसखेड : पुढारी वृत्तसेवा : अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी डाऊ केमिकल प्रकल्पाची जाळपोळ करणे आणि कंपनीवर दरोडा टाकल्या प्रकरणी खटल्यातील सर्वच्या सर्व 44 आंदोलकांची निर्दोष मुक्तता करण्याचा निकाल राजगुरुनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. पी. पोळ यांनी गुरुवारी (दि. 29) दिला. सलग 15 वर्षे चाललेल्या या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्याने सर्वच आंदोलकांनी आनंद व्यक्त केला. या आंदोलकांमध्ये ह.भ.प. बंडातात्या कराडकर, शिंदेचे माजी चेअरमन विठ्ठलतात्या पाणमंद, भाजपचे तालुका उपाध्यक्ष सुनील देवकर, उद्योजक अंकुश घनवट, माजी सरपंच सचिन देवकर, विनोद पाचपुते, नेताजी गाडे, तुकाराम मेंगळे,शिवाजी मिंडे, सचिन पानमंद, गुलाब आघाने, संजय पानमंद आदींचा समावेश होता.