जंक्शन(पुणे); पुढारी वृत्तसेवा : संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. ठिकठिकाणी पालखी महामार्गाचे काम अपूर्ण असल्याने पालखी सोहळ्यावेळी वारकर्यांसह वाहनचालकांना त्रास होणार आहे. लासुर्णे (ता. इंदापूर) परिसरातील चिखली फाट्याजवळ पालखी महामार्गाचे काम अपूर्ण आहे. दोन रस्ते तयार करताना रस्त्याच्या दोन्ही भागांतील काही भागांचे डांबरीकरण न केल्याने जागोजागी मुरूम व खडी उखडली आहे.
बारामतीकडून इंदापूरकडे व इंदापूरकडून बारामतीकडे वेगाने येणार्या वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने वारंवार अपघात घडत आहेत. रस्त्याचे डांबरीकरण न केल्याने मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून, ती वाहनचालकांच्या डोळ्यांत जात आहे. अपघाताच्या घटना वाढण्यामागे हेही कारण आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. पालखी सोहळा येत्या काळात याच रस्त्यावरून जाणार असल्याने प्रशासनाने दखल घेऊन रस्त्याचे डांबरीकरण ताबडतोब करून देण्याची मागणी होत आहे.