परिंचे : पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यातील अंबड येथे झालेल्या ओबीसी मेळाव्यामध्ये अनेक ओबीसी नेत्यांनी वादग्रस्त विधाने करून मराठा आणि ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने पुरंदर तालुक्यामध्ये ओबीसी आणि मराठा समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.
मराठा समाजाला भूमिका समजावण्याकरिता मनोज जरांगे पाटील यांच्या प्रचंड अशा सभा होताना दिसत आहेत. लोक त्यांना ऐकण्यासाठी दिवसभर उन्हामध्ये थांबतात, तसेच काही ठिकाणी रात्री-अपरात्रीही थांबतात. आरक्षण घेतल्याशिवाय एकही इंच मागे सरणार नाही, अशी त्यांची ठाम भूमिका असल्यामुळे महाराष्ट्रातील सकल मराठा समाज त्यांच्या सभेला तुफान गर्दी करीत आहे. सरकारलाही त्यांच्यापुढे नमावे लागत असून,
त्यांना पर्याय काढावे लागत आहे. गरजवंत मराठ्यांचा हा लढा असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र जरांगेमय झालेला आहे.
लोकप्रतिनिधी आपली कातडी वाचवण्यासाठी सावध भूमिका घेताना दिसत आहेत, परंतु ओबीसी समाजाचे नेते आणि राज्यातील मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी महामेळाव्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यावर खालच्या पातळीवरती टीका केल्याने राज्यभर माळी-मराठा वाद लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. येणार्या काळामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची दाट शक्यता आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केल्यामुळे पुरंदर तालुक्यातील अनेक ओबीसी बांधवांनाही हे पटलेले नाही. ओबीसी समाजही आपल्याच वाचाळवीर नेत्यांच्या विरोधात दबक्या आवाजात बोलताना दिसत आहेत. आरक्षणाची लढाई ही घटनेला धरून असून, त्याच मार्गाने लढून जिंकावी, तसेच दोन्ही बाजूंनी वादग्रस्त विधान न करता संयमाने कायदेशीर मार्गाने आरक्षण मिळवावे, असेही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आपले मत मांडले आहे.
अंबड येथील ओबीसी मेळाव्यामध्ये अनेक ओबीसी नेत्यांनी कायदा-सुव्यवस्था बिघडेल, अशा प्रकारची घातक विधाने करून ओबीसी समाज आणि मराठा समाज यांना भडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशीच विधाने एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीने केली असती, तर ताबडतोब त्याच्यावरती गुन्हा दाखल होऊन त्याला अटक झाली असती. परंतु, सरकारमधीलच मंत्री, विरोधी पक्षनेते, अनेक ओबीसी समाजाचे नेते भडकाऊ भाषण करून महाराष्ट्र पेटवण्याची भाषा करीत आहेत.
हेही वाचा