पुणे : दिव्यांगांसाठी सरकारकडून अनेक उपक्रम हाती घेण्यात आले असून, लवकरच राज्यात खास दिव्यांगांसाठीच्या विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. दीपस्तंभ फाउंडेशन, मनोबल पुणे परिवारातील दिव्यांग, अनाथ आणि वंचित विद्यार्थ्यांचा विविध स्पर्धा परीक्षा व राष्ट्रीयस्तरावरील प्रवेश परीक्षांत मिळवलेल्या यशाबद्दल आयोजित सत्कार सोहळ्यात पाटील बोलत होते.
कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून केंद्रीय अपंग सक्षमीकरण विभागाचे सचिव राजेश अग्रवाल, पंजाबमधील अंधत्वावर मात करून आयएएस झालेले अजय अरोरा, पुण्याचे जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन,दीपस्तंभ फाउंडेशनचे मुख्य सल्लागार मधुकर कोतवाल आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, आजचा हा कार्यक्रम इतका भावस्पर्शी झाला आहे, की मी भारावून गेलो आहे. एखादा अवयव नसल्याने काहीच बिघडत नाही, जे आपल्याकडे आहे त्याद्वारे काय कर्तृत्व गाजवता येते हे दाखवणारा हा सोहळा आहे. सरकारी कामात प्रेरणा जागृत करण्याची, संवेदनशीलता निर्माण करण्याची गरज आहे. लोकांचे सहकार्य व सहभाग महत्त्वाचा आहे. समाजामध्ये देण्याची मोठी ताकद आहे. आपल्याला केवळ देण्याची इच्छा निर्माण करायला हवी.
राजेश अग्रवाल म्हणाले, दिव्यांगाच्या करिअर व शिक्षणाच्या सक्षमीकरणासाठी देशात दीपस्तंभ मनोबलसारख्या संस्थाची आवश्यकता आहे. मनातील उमेद, जिद्द कधीच हरू नका. आपल्यातील इच्छाशक्ती, करुणाभाव आणि व्यावसायिकता आपल्याला यशाकडे घेऊन जाते. यजुर्वेंद्र महाजन यांनी प्रास्ताविक केले.
रेल्वे अपघातात दोन्ही पाय व एक हात गमावलेल्या सुरेश तिवारी याने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. दोन्ही पाय नसलेल्या आणि अनाथ असलेल्या राज या विद्यार्थ्याची सर जेजे स्कूल ऑफ आर्ट्स येथे प्रवेश परीक्षेतून निवड झाली. अनाथ आणि दोन्ही डोळ्यांनी दृष्टिहीन असणार्या मोहिनी शर्माची बँक प्रोबेशनरी अधिकारीपदी निवड झाली. दीपस्तंभ मनोबलच्या विद्यार्थ्यांचा जीवनप्रवास ऐकताना सर्वच उपस्थितांचे डोळे पाणावले.