सोमेश्वरनगर; पुढारी वृत्तसेवा: पतसंस्था टिकविण्यासाठी कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे. सभासदांनी कर्ज वेळेत फेडण्याची मानसिकता तयार करावी, असे आवाहन सोमेश्वर कारखान्याचे संचालक आणि अजयश्री पतसंस्थेचे अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी केले.
अजयश्री पतसंस्थेची 29 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (दि. 24) मुरुम येथील पतसंस्थेच्या अजयश्री मल्टिपर्पज हॉल येथे झाली, त्या वेळी शिंदे बोलत होते. पतसंस्थेचे अध्यक्ष माऊली कदम सभेच्या अध्यक्षस्थानी होते.
ज्येष्ठ ग्रामस्थ नंदकुमार शिंदे, माऊली कदम, उपाध्यक्ष बापूराव बारवकर, कांतीलाल चव्हाण, सर्व संचालक मंडळासह सभासद व कर्मचारी उपस्थित होते. व्यवसाय उभारण्यासाठी पतसंस्था तरुणांना कर्जपुरवठा करीत असते. वेळेत कर्ज परतफेड केल्यास 101 व 156 या कारवाईची वेळ येणार नाही. थकीत कर्जदारांवर कारवाईसाठी शासन पतसंस्थांना सहकार्य करीत आहे, असे शिंदे म्हणाले.
उद्योजक दीपक साखरे, डॉ. राहुल शिंगटे, संतोष कदम, मधुकर फरांदे आदींनीही चर्चेत सहभाग घेतला. खेळीमेळीत वार्षिक सभा पार पडली. अजयश्री पतसंस्थेला ऑडिट वर्ग 'ब' मिळाला आहे. पतसंस्थेचे 1456 सभासद असून, वसूल भागभांडवल 3 कोटी 92 लाख आहे. निधी 6 कोटी 11 लाख, तर ठेवी 31 कोटी 43 आहेत, तर पतसंस्थेने 31 कोटी 28 लाख कर्ज वाटप केले आहे. चालू वर्षात पतसंस्थेला 40 लाख नफा झाला आहे. पतसंस्थेने सभासदांसाठी चालू वर्षात 7 टक्के लाभांश जाहीर केला आहे, असे सचिव पुरुषोत्तमदास बोत्रे यांनी सांगितले.