पिंपरी : पुढारी वृत्तसेवा: पिंपरी-चिंचवड शहरात वर्षानुवर्षे कायम असलेला भला मोठा प्रश्न म्हणजे जागोजागी असलेले खड्डे. शहरातील डांगे चौक, पिंपरी येथील मोरवाडी चौक, आकुर्डी रेल्वे बोगदा, माणकर चौक, थेरगाव फाटा, कासारवाडी येथील चौकाचौकांत खड्ड्यांची मालिका उभी राहिली आहे. या खड्ड्यांचं करायचं काय? असा संतप्त सवाल, नाहक त्रास सहन करणार्या नागरिकांचा आहे.
शहरातील खड्डे महापालिकेच्या वतीने ठेकेदारांकडून तात्पुरती डागडुजी करून बुजविण्यात येतात. मात्र पाऊस पडला की, पुन्हा अवस्था 'जैसे थे' होते. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जागोजागी पुन्हा खड्डे पडले आहेत. पावसामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहनांना झटका बसून किरकोळ अपघाताच्या घटना घडत आहेत.
वाहनांच्या दुरुस्तीचा खर्च वाढला
साचलेल्या पाण्यामधून वाहने गेल्यानंतर वाहनांच्या सायलेंसरमध्ये बिघाड होत असून, वाहने नादुरुस्त होत आहेत. परिणामी वाहनचालकांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
वाहनचालकांत पाठ-मानेचे आजार बळावले
खड्ड्यांमधून वाहने गेल्यानंतर वाहनचालक आणि त्याच्या मागे बसलेल्या व्यक्तिला जोराचा झटका बसतो. त्यामुळे पाठ व मानेचे आजार बळावले आहेत. बर्याच नागरिकांना खड्ड्यांमुळे कायमचे दुखणे लागले आहे.
प्रशासन ढिम्म
सारथी अॅपवर परिसरातील खड्ड्याबाबत नागरिकांच्या सतत तक्रारी सुरू असतात. मात्र, याकडे महापालिका कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे नागरिकही तक्रारी देऊन वैतागले आहेत. महापालिकेचा सर्व कर भरणा करूनही करदात्या नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी होत आहेत.
संबंधित ठेकेदारांवर कारवाईची मागणी
महापालिकेच्या वतीने ठेकेदारांकडून रस्त्याची कामे करण्यात येतात; मात्र खड्डा पडला की, तात्पुरती डागडुजी करण्यात येते; परंतु पावसाच्या पहिल्याच सरीत या रस्त्यांची अवस्था जैसे थे होते. या खड्ड्यांमुळे वाहनांचे अपघात होत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून येत आहेत.