वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : वेल्हे तालुक्यातील तोरणा – राजगड भागांत यंदा गतवर्षीच्या तुलनेत 46 टक्के कमी पाऊस पडला आहे. मात्र, धानेप येथील गुंजवणी धरणात 3.21 टीएमसी म्हणजे 87.20 टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणाची साठवणक्षमता 3.69 टीएमसी आहे.
सोमवारी (दि. 28) दिवसभरात गुंजवणी धरणमाथ्यावर 7 मिलिमीटर पाऊस पडला. यंदा 1 जूनपासून 28 ऑगस्टपर्यंत केवळ 1200 मिलिमीटर पाऊस पडला. गेल्या वर्षी याच कालावधीत तब्बल 2223 मिलिमीटर इतका पाऊस पडला होता.
गुंजवणी धरण प्रकल्पाचे उपअभियंता नयन गिरमे म्हणाले की, धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी आहे. रिमझिम पावसामुळे मंदगतीने वाढ होत आहे. धरण शंभर टक्के भरले नसल्याने नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आलेला नाही. वीजनिर्मिती केंद्राच्या सांडव्यातून काही दिवस पाणी सोडले होते. त्यानंतर पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे. धरण शंभर टक्के भरल्यानंतर जादा पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. भात शेतीलाही जोरदार पावसाची गरज आहे.