Loksabha election | चीनची घुसखोरी वाढतेय; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर | पुढारी

Loksabha election | चीनची घुसखोरी वाढतेय; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : 2014 सालातील लोकसभा निवडणुकीत मोदी यांनी मी सगळ्यात स्ट्राँग नेता आहे, असे सांगत देशाची सुरक्षा मी करू शकतो, अस वक्तव्य केले होते. पण, आज परिस्थिती वेगळी आहे. आज चीन आपल्या देशात घुसत आहे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पुण्यात आहेत. सोमवारी (दि.6) सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, दिवसेंदिवस देशाच्या सुरक्षेला धोका वाढत आहे. आता नेपाळसारखा देश सुद्धा आपल्या देशाला चॅलेंज देत आहे. त्यांच्या नोटावर आपला असणारा भाग त्यांनी त्यांचा भाग दाखवला आहे. उत्तराखंड मधला हा सगळा भाग आहे. तेथील पंतप्रधानांनी कॅबिनेट घेऊन हा निर्णय घेतला आहे. मालदीव सोबत वैयक्तिक प्रॉब्लेम झाल्याने तेथील आर्थिक मदत बंद केली आहे. मालदीवविरोधात कारवाई केली जात आहे. सरकार यावर काहीच बोलले नाही. मालदीव आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे बेट आहे. बांगलादेश सोबतचे आपले संबंध बिघडत चालले आहेत. बाजूचा केवळ भूतान देश आपल्या सोबत असून, इतर सगळ्या देशांशी आपले संबंध बिघडले आहेत, हे लक्षात येत आहे.

आपले शेजारी देश आपल्याला सोडून गेले आहेत. आपण एकटे पडलो आहोत, हा खूप मोठा धोका आहे. जर्मन, फ्रान्स हे देशदेखील आपल्यापासून अंतर ठेवत आहेत. हे सरकार 2024 मध्ये जर निवडून आले तर इतर देश कायदा करतील की, इतर देशातील किती लोक आपल्या देशात राहणार याचा सगळ्यात जास्त फटका आपल्या भारताला बसणार आहे. भाजपमुळे इतर देशांना आपले धोरण बदलावे लागत आहे, याचा फटका आपल्याला बसला आहे, यापुढे देखील तो फटका बसेल, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button