![ज्येष्ठ पत्रकार भरत अवचट यांचे निधन](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F04%2Fpatrakar-1.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
ओतूर : पुढारी वृत्तसेवा : आपल्या अपंगत्वावर मात करत लेखणीच्या माध्यमातून केवळ ओतूर(ता.जुन्नर) पंचक्रोशीतच नव्हे तर जुन्नर तालुक्यासाठी समाज प्रबोधनाचे अनेक दशके निरंतर कार्य करणारे, समाजभूषण, शिवनेर भूषण पुरस्कार प्राप्त,आदर्श ज्येष्ठ पत्रकार भरत त्र्यंबक अवचट (वय ७०) यांचे मंगळवारी( दि.२४) सायंकाळी ओतूर येथील त्यांचे रहाते घरी अल्पशा आजाराने निधन झाले.
अवचट यांनी जुन्नर तालुक्याच्या कानाकोपऱ्यातील दुर्गम पट्ट्यातील आदिवासी,धरणग्रस्तांच्या समस्या,रस्त्यांचे, विजेचे आणि सामाजिक प्रश्नांना आपल्या लेखणीतून वेळोवेळी वाचा फोडल्याने ते एक अवलिया पत्रकार ठरले. एक समाजसेवक, उत्कृष्ट समीक्षक, व्याख्याता, निवेदक, मार्गदर्शक पत्रकार आणि लेखक म्हणून त्यांचा ओतूर पंचक्रोशीत नावलौकिक कायमचा कोरला गेला.त्यांच्या निधनाने पत्रकारितेच्या क्षेत्रातील आदर्श आधारवड काळाच्या पडद्याआड गेला.
त्यांचे निधनाची वार्ता ओतूर परिसरात पसरताच सामाजिक, शैक्षणिक,धार्मिक, पत्रकारिता व राजकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांची त्यांचे अंत्यदर्शनासाठी रीघ लागली होती. ओतूर येथील सामाजिक कार्यकर्ते विक्रम अवचट व प्रसिध्द लेखक दिवंगत डॉ. अनिल अवचट यांचे ते बंधू होत.
हेही वाचा