पोलिसांचे कर्तव्य, नागरिकांची कृतज्ञता! चोरीला गेलेला ऐवज तक्रारदारांना परत.. | पुढारी

पोलिसांचे कर्तव्य, नागरिकांची कृतज्ञता! चोरीला गेलेला ऐवज तक्रारदारांना परत..

पुणे :  पुढारी वृत्तसेवा :  शहरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांतील एकूण 2 कोटी 32 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करून तो फिर्यादींना परत करण्यात पुणे पोलिसांना यश मिळाले आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यांमधील मौल्यवान व किंमती मुद्देमाल, रोख रक्कम, लॅपटॉप, मोबाईल फोन, दुचाकी-तीनचाकी वाहने असा मुद्देमाल हस्तगत करून तो सहायक पोलिस आयुक्तांच्या हस्ते फिर्यादींना सुपूर्त करण्यात आला. त्यामुळे पोलिसांचे कर्तव्य आणि मौल्यवान वस्तू परत मिळालेल्याची कृतार्थता असा हा सोहळा ठरला.
परिमंडळ 1 च्या पोलिस उपक्षेत्रातील खडक, समर्थ, फरासखाना, शिवाजीनगर व डेक्कन पोलिस ठाण्यामध्ये घरफोडी आणि चोरीचे वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते.
त्याचा तपास करून एकूण 2 कोटी 21 लाख 54 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांच्या पथकाला यश मिळाले. गुन्ह्यातील फिर्यादी यांना तपासात हस्तगत केलेला मुद्देमाल परत देण्यासाठी सदरचा मुद्देमाल हा फिर्यादी यांना परत करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पोलिस सह आयुक्त प्रवीण पवार, अपर पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, परिमंडळ 1 चे पोलिस उपआयुक्त संदीप सिंह गिल्ल, फरासखाना विभागाचे सहायक पोलिस आयुक्त रुक्मिणी गलंडे, विश्रामबाग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस आयुक्त साईनाथ ठोंबरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे, वरिष्ठ पोलिस निरीक्षकी रवींद्र गायकवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मारुती पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विपीन हसबनीस हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला पोलिस उपनिरीक्षक पंधरकर आणि समारोप सहायक पोलिस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांनी केला.

हेही वाचा

 

Back to top button