Loksabha election 2024 : दौंडचे ‘दादा-अप्पा’ जीवाचे रान करणार का ? | पुढारी

Loksabha election 2024 : दौंडचे ‘दादा-अप्पा’ जीवाचे रान करणार का ?

विजय चव्हाण

केडगाव : लोकसभेच्या निवडणुकीत बारामतीच्या अजितदादांच्या विजयासाठी दौंडमधील कट्टर विरोधक आमदार राहुलदादा कुल आणि माजी आमदार रमेशअप्पा थोरात यांची एकत्रित प्रचार करताना मोठी कसरत होणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीतील संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार आणि उमेदवारी निश्चित होऊन प्रचारास लागलेल्या सुप्रिया सुळे यांच्यासाठी मतदार काय करणार, नेते काय करणार याचा अंदाज बांधण्याचा कार्यक्रम अनेकांनी हातात घेतला आहे. दौंड तालुक्यातील राजकारणाचा कणा हा बारामतीकरांच्या राजकीय प्रवाहात कणखर बनलेला आहे, यातून तालुक्यात विद्यमान आमदार राहुलदादा कुल आणि माजी आमदार रमेशअप्पा थोरात असे दोन गट तयार झाले आहेत. बारामतीकरांच्या राजकीय प्रवाहातून या दोघांच्या राजकारणाची सुरुवात झाली असून ते राज्यभर परिचित आहेत. मागील काळामध्ये पवारांशी फारकत घेऊन कुल व थोरात हे दोघेही वेगळ्या पक्षात गेले, त्यापैकी काँग्रेसमध्ये गेलेले

रमेश थोरात परत स्वगृही परतले आणि कुल यांनी एकदा राष्ट्रीय समाज पक्ष आणि नंतर भाजपा असा प्रवास करत ते आता भाजपाचे विद्यमान आमदार असून जिल्ह्यातील भाजपचे वजनदार नेते आहेत. दोघांच्याही राजकारणाची सुरुवात शरद पवार यांच्या विचाराने झाली आहे. 1990 साली विद्यमान आमदार राहुल कुल यांचे दिवंगत वडील सुभाष कुल यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि विजय संपादन केला. या विजयात सर्वाधिक वाटा आता विद्यमान आमदार राहुल कुल यांचे कट्टर विरोधक असलेल्या माजी आमदार रमेश थोरात यांचा होता. अपक्ष निवडून आलेले सुभाष कुल हे शरद पवारांच्या सहवासात गेले आणि तिथून पुढे त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला.

2000 साली सुभाष कुल यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी रंजनाताई कुल यांच्या उमेदवारीच्या वेळी कुल -थोरात वाद उफाळून आला, त्यावेळी थोरात यांनी पक्षाची उमेदवारी मागितली होती आणि वादाची ठिणगी पडून एकाच कुटुंबाचं एक रूप असलेले थोरात-कुल हे पवार समर्थक दोन वेगवेगळ्या प्रवाहाने राजकारण करू लागले आणि तालुक्यात हे दोन गट निर्माण झाले होते, दोन्ही गटांचे राजकारण हे बारामतीकरांच्याच विचाराने सुरू होते, ते विद्यमान आमदार राहुल कुल यांनी राष्ट्रीय समाज पक्षात जाऊन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. या अगोदर रमेश थोरात काँग्रेसमध्ये गेले होते, त्यांनीही पवार विचार सोडण्याचा प्रयत्न केला, परंतु ते परत पवारांकडे आले.

कुल मात्र परत फिरले नाहीत, त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकिटावर विजय संपादन करून दौंड तालुक्याचे आमदारपद मिळविले आणि नंतर भाजपात जाऊन ते राखले. रमेश थोरात यांनी अपक्ष उभे राहून कुल यांचा पराभव केला होता. आज पवार घराण्यातच दुफळी पडली असून शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार हे दोन गटात विभागलेले आहेत. या दोन्ही गटांमध्ये सध्या लोकसभेची चुरस राज्यात पाहायला मिळेल, अशी सर्वांची अपेक्षा आहे. मात्र निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतर माघार घेईपर्यंत ही चुरस होईल की नाही याची खात्री कोणालाही वर्तवता येणार नाही.

या परिस्थितीमध्ये दौंड तालुक्यामध्ये काय होईल असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे, मात्र यापूर्वी बारामतीकरांच्या तालमीत तयार झालेले कुल आणि थोरात परत एकदा बारामतीकरांच्याच विजयासाठी एकत्रित येणार असल्याने या तालुक्यांमध्ये बारामतीकरांच्याच कामासाठी पुन्हा एकदा दोघांना सज्ज व्हावे लागणार आहे. भाजपामध्ये असलेले राहुल कुल सध्या पक्ष देईल तो आदेश मान्य करून काम करेल, असे सांगत आहेत. सध्या अजित पवार भाजपाचे मित्र आहेत, त्यामुळे कुल यांना त्यांचे काम करावे लागणार आहे. रमेश थोरात आणि राहुल कुल यांचे विळ्या-भोपळ्याचे वैर असूनही या निवडणुकीत रमेश थोरात अजित पवारांचे कट्टर समर्थक म्हणून प्रचार करतील आणि त्यांच्याच बरोबर कुल यांना प्रचार करावाच लागेल. शेवटी बारामतीकरांच्याच विजयासाठी कुल आणि थोरात या कट्टर विरोधकांना काम करावे लागेल अशी परिस्थिती आहे.

हेही वाचा

Back to top button