पहाटेचा शपथविधी ठरवून, मला बदनाम केले : अजित पवारांचे शरद पवारांवर टीकास्त्र | पुढारी

पहाटेचा शपथविधी ठरवून, मला बदनाम केले : अजित पवारांचे शरद पवारांवर टीकास्त्र

राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेला बाजुला ठेऊन भाजप बरोबर जायचे आमचे ठरले होते.मात्र अचानक बदल झाल्याने आमचा पहाटेचा शपथविधी वाया गेला. सगळे यांना विचारात घेऊन झाले. मात्र नंतर मला एकट्याला बदनाम करण्यात आले. अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता केली राजगुरूनगर येथे कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार बोलत होते. मी साठीच्या पुढे गेलो तरी पक्षात होणाऱ्या बदलात देखील मला विचारात घेतले जात नव्हते, मला विचारून पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करायचे ठरवले. नंतर परत राजीनामा मागे घेण्यात आला. असे अनेकदा अनुभवले. वारंवार मला टार्गेट केले. याची कल्पना माझ्याबरोबर आलेल्या सगळ्यांना होती. म्हणुन निर्णय घेताना मला सर्वांनी साथ दिली असेही अजित पवार यांनी सांगितले.

आमचे ऐकले असते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सहकारी मंत्री व आमदार सुरतला जाऊ शकले नसते. अनेक राजकिय घडामोडी थांबल्या असत्या. असा खुलासाही शरद पवार यांच्या वर आरोप करीत अजित पवार यांनी केला. २०१९ मध्ये माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि आपले सरकार होते. अडीच वर्षात दोन वर्षे कोरोना होता. कामे ठप्प होती.ठाकरे कार्यकर्त्यांना फारसे उपलब्ध होत नव्हते.त्यातच सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विभागात काही जण जास्तच हस्तक्षेप करीत होते. त्यामुळे शिवसेना मंत्री आणि अमदारांत अस्वस्थता पसरली होती.आम्ही ‘मोठया साहेबांना’ सांगत होतो. ते एकनाथ शिंदे यांना फोन करायचे. शिंदे शेतात असल्याचे सांगायचे. अखेर जे व्हायचे ते झाले असेही अजित पवार यांनी सांगितले.

अखेर लोकांची कामे करायला सत्ता लागते. ती कुणाच्या तरी बरोबरीने घ्यावी लागते. केवळ आपल्या राज्यात एका पक्षाचे सरकार येत नाही.त्यामुळे भविष्यात सर्वानाच एकमेकांचे सहकार्य घ्यावे लागणार आहे. आपण भाजप बरोबर गेलो तरी विचारधारा सोडलेली नाही. असे अजित पवार म्हणाले. हे सांगताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव केला. शेजारी देश वचकून असल्याचा खुलासा केला. अर्थव्यवस्थेत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यात आणखी वरचे स्थान मिळवायचे असेल तर मोदींना पर्याय नाही. विरोधकांकडे चेहरा नाही. विकासाचे व्हिजन नाही असे ते म्हणाले.

हेही वाचा

Back to top button