राज्यातील जलसाठा ५० टक्क्यांच्याही खाली, भीषण पाणीटंचाईची शक्यता | पुढारी

राज्यातील जलसाठा ५० टक्क्यांच्याही खाली, भीषण पाणीटंचाईची शक्यता

शिवाजी शिंदे

पुणे : राज्यात असलेल्या धरणांचा जलसाठा झपाट्याने कमी होत असून, ऐन फेब्रुवारी महिन्यातच जलसाठा पन्नास टक्क्यांच्याही खाली घसरला आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत राज्यात जलस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. आताच पाण्याची बचत करणे अत्यंत गरजेचे आहे; अन्यथा राज्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात मागील वर्षी 65.63 टक्के पाणीसाठा होता. यावर्षी मात्र त्यामध्ये घट होऊन तो 48.89 टक्क्यांवर आला असून, गतवर्षीपेक्षा सुमारे 17 टक्क्यांनी कमी असल्याचे चित्र आहे.

राज्यात जलसंपदा विभागाच्या अंतर्गत नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे आणि कोकण असे सहा विभाग आहेत. या सहा विभागांत मिळून एकूण 2 हजार 994 एवढी लहान-मोठी धरणे आहेत. या सर्वच धरणांमधील जलसाठा गेल्या काही महिन्यांपासून झपाट्याने कमी होत चालला आहे. गतवर्षीच्या पावसाळ्याच्या दिवसांत अगदी मोजकेच दिवस पाऊस पडला. त्यातही मराठवाड्यातील जवळजवळ सर्वच भागांत पावसाने अतिशय कमी हजेरी लावली होती. (तीन ते चार वर्षांपूर्वी याच भागातील कायम दुष्काळी असलेल्या धाराशिव, लातूर तसेच बीड जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे या भागात ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ शासनावर आली होती.) त्यामुळे या भागावर जलसंकट घोंघावत आहे.

कायमच सधन आणि पाण्याखालचा प्रदेश असे संबोधन असलेल्या पुणे विभागात मागील वर्षी पावसाने चांगलीच ओढ दिली. त्यामुळे या विभागातील पुण्यासह सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत आतापासूनच पाण्याच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यातही उजनी धरणाचा पाणीसाठा सरासरीपेक्षा जास्तच खालावल्याने सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश भागांस आतापासूनच पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर तसेच सांगली जिल्ह्यांतील स्थितीदेखील फारशी समाधानकारक नाही. त्यामुळे या भागात असलेल्या धरणांतील जलसाठ्याच्या उपशावर मर्यादा येऊ लागल्या आहेत.

नागपूर आणि अमरावती विभागात राज्यातील इतर विभागांपेक्षा काही प्रमाणात मोठा पाणीसाठा असलेली धरणे आहेत; मात्र कमी पावसामुळे याही भागातील धरणे ऐन पावसाळ्याच्या दिवसांतदेखील भरली नाहीत. त्याचा फटका आता बसू लागला आहे. राज्यात जलसाठ्याचा सर्वाधिक फटका छत्रपती संभाजीनगर भागाला बसला आहे. या भागात 20.04 टक्के एवढा पाणीसाठा आहे. त्यामुळे या भागात इतर विभागापेक्षा जास्त प्रमाणात पाण्याचे नियोजन करण्याचे गरज आहे. नाशिक भागातही फारशी चांगली स्थिती दिसून आली नाही. या भागात मागील वर्षी 63.84 टक्के एवढा पाणीसाठा होता. यावर्षी या भागात कमी पाऊस पडल्यामुळे सध्या केवळ 50.42 टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

दरम्यान, राज्यातील जलसाठ्याचे राज्य शासनाने आताच नियोजन केले नाही, तर ऐन उन्हाळ्याच्या म्हणजेच एप्रिल मे तसेच जून महिन्यातील किमान वीस ते पंचवीस दिवस उन्हाळ्याच्या तीव्र झळांबरोबरच ‘पाण्याच्या झळां’चा फटका बसण्याची चिन्हे आहेत.

Back to top button