समाज वैचारिकतेपासून दूर जातोय : ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे | पुढारी

समाज वैचारिकतेपासून दूर जातोय : ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कोणत्याही देशाला गुलाम करायचे झाले तर तेथील वाचनालयांवर हल्ला केला जातो, हे इतिहास आपल्याला सांगतो. आज महत्वाच्या आणि प्रकाशित झालेल्या पुस्तकांकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यावर चर्चा होत नाही, वाचक वाचत नाहीत आणि ती पुस्तके विस्मरणात जातात. समाजात पुस्तकांबद्दल अनास्था निर्माण झाली आहे. सध्या समाज मनोरंजनाकडे जास्त वळला असून वैचारिकतेपासून समाज दूर जात आहे, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांनी बुधवारी व्यक्त केली.

पुणे नगर वाचन मंदिराच्या 176 व्या वर्धापनदिनानिमित्त विविध पुरस्कारांचे वितरण सासणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष मधुमिलिंद मेहेंदळे, उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, कार्यवाह सुवर्णा जोगळेकर, सहकार्यवाह डॉ. प्रसाद जोशी आदी उपस्थित होते. कै. आर. एल. नगरकर प्रतिष्ठान पुरस्कृत डॉ. श्री. व्यं. केतकर वाचन चळवळीतील आदर्श कार्यकर्ता पुरस्कार श्यामसुंदर जोशी, अ‍ॅड. शरद तपस्वी आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार चैत्राम पवार यांना आणि कवी ह. स. गोखले संत साहित्य विषयक ग्रंथलेखन पुरस्कार विद्याधर ताठे यांना प्रदान करण्यात आला. सासणे म्हणाले, तरुण पिढी वाचनापासून दूर जात आहे.

हे आपल्याला आपल्या कुटुंबातून जाणवते. ज्यांच्यासाठी आपण लिहितो, ती पिढी आपल्यापासून दूर गेली आहे. यामुळे अरसिकता, अडाणीपणा यातून निर्माण होणार असल्याचे चित्र आहे. बालकुमार साहित्य हा आपला वारसा आहे, मात्र त्यात जुनी मराठी भाषा आहे. त्यामुळे बालकुमार साहित्यातील लहान मुलांना काय द्यावे, हा सगळ्यांसमोर प्रश्न आहे. जोशी यांनी ग्रंथ या शब्दाची महती आपल्याला समजलेली नाही. वाचन करणार्‍यांमध्ये अक्षर वाचन करणारे खूप आहेत. अक्षर वाचन म्हणजे वाचन नाही. आपल्याला माणूस वाचता आला पाहिजे, असे सांगितले. रोहित जोगळेकर यांनी सूत्रसंचालन केले. संकेत देशपांडे यांनी आभार मानले.

हेही वाचा

Back to top button