गीताभक्ती अमृत महोत्सवानिमित्त आळंदी दुमदुमली | पुढारी

गीताभक्ती अमृत महोत्सवानिमित्त आळंदी दुमदुमली

आळंदी : पुढारी वृत्तसेवा :  वाढदिवस हे केवळ निमित्त आहे, या निमित्ताने श्रीज्ञानोबा-तुकारामांचे विचार देशभरात पोहोचेल. विश्व कल्याणाचा व समन्वयाचा, शांती आणि प्रेमाचा संदेश आपल्या सर्व संतांनी दिला. महाराष्ट्राचे संत शिरोमणी श्रीज्ञानदेवांच्या भूमित हा कार्यक्रम होत असल्याचा आनंद असल्याचे मत गोविंददेव गिरिजी महाराज यांनी व्यक्त केले. आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण धर्मरक्षा आणि राष्ट्र निर्माणासाठी समर्पित करणारे पूज्य स्वामी गोविन्ददेव गिरिजी महाराज स्वामी विवेकानंदांसारख्या संत परंपरेचे प्रचारक आहेत. दरवर्षी पूज्य स्वामीजींचा जन्मदिवस गीताभक्ती दिवस म्हणून साजरा केला जातो. मात्र, यावर्षी स्वामीजींच्या दिव्य जीवनाची 75 वर्षे पूर्ण होत असल्याने संलग्न संस्थांनी ’गीताभक्ती अमृत महोत्सवा’चे आयोजन केले आहे.

रविवारी (दि. 4) सकाळी संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर माउलींना अभिषेक व त्यानंतर वारकरी सत्कार, यज्ञ विधीचा शुभारंभ व कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. गीता परिवार, महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान, श्रीकृष्ण सेवानिधी व संत श्रीज्ञानेश्वर गुरुकुल या संस्थानी गीताभक्ती अमृतमहोत्सव सोहळ्याचे आयोजन करून भारतीय संस्कृती आणि परंपरेचा अनोखा मेळ घातल्याचेही स्वामीजींनी यावेळी सांगितले. आजच्या कार्यक्रमाला वारकरी संप्रदायासह पूज्य स्वामी गोविन्ददेव गिरिजी महाराज यांना मानणारे हजारो भाविक उपस्थित होते.

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष, राष्ट्रसंत पूज्य स्वामी गोविन्ददेव गिरिजी महाराज यांच्या 75 व्या जन्मसोहळ्यानिमित्त आळंदीनगरी सज्ज झाली आहे. रविवारी सकाळी मलुक पीठ, वृंदावनचे संत राजेंद्रदास महाराज यांच्या उपस्थितीत धार्मिक अनुष्ठान करण्यात आले. जवळपास 15 हजारांहून अधिक भाविकांच्या उपस्थितीत सकाळी श्रीज्ञानेश्वर माउलींना अभिषेक झाला. हा गीताभक्ती अमृत महोत्सव 11 फेब—ुवारीपर्यंत चालणार आहे.

 

Back to top button