पुणे : अनैतिक संबंधाच्या संशयातून झालेल्या खुनाचा छडा
अनैतिक संबंधाच्या संशयातून शाळेत काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाचा टोळक्याने हल्ला करून कोंढव्यात खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यानंतर कोंढवा पोलिसांनी चौघा जणांना बेड्या ठोकत हा गुन्हा उघडकीस आणला आहे. सुपरवायझर ऋषीकेश राजेश गायकवाड (वय 23, रा. भाग्योदयनगर, कोंढवा), किशोर भागवत गायकवाड (वय 29, रा. खडी मशीन चौक), जुबेर पापा इनामदार (वय 37, रा. इनामदार वाडा, कोंढवा) आणि अमीन मुसा पानसरे (वय 23, रा. चांदतारा चौक, कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. रवी कचरू नागदिवे (50, रा. नेवसेमळा, देवाची उरूळी) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर त्याचा मित्र बालाजी चव्हाण या घटनेत गंभीर जखमी झाला आहे.
रवी नागदिवे हे उरूळी देवाची येथील एका शाळेत सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. तर त्यांचा साथीदार बालाजी चव्हाण हा रिक्षा चालक आहे. रवी नागदिवे यांची 53 वर्षाची मैत्रीण ही येवलेवाडी येथील जमिनीची देखभाल करत होती. डोंगराजवळ असलेल्या प्लॉटींगमध्ये तिचे घर आहे. नागदिवे हा तिला त्या ठिकाणी भेटण्यासाठी त्याचा मित्र बालाजी चव्हाण याच्या रिक्षात जात असत.
प्लॉटिंगच्या सुपरवायझरसह इतरांना नागदिवेच्या संबंधीत महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आला. तसेच तेथे असलेल्या खोलीचा वापर गैरकृत्यासाठी करत असल्याचाही त्यांना संशय होता. याच कारणातून सोमवारी (दि.22) दुपारी नागदिवे, बालाजीला संबंधीत सुपरवायझरने भेटण्यासाठी येवलेवाडी येथील त्या प्लॉटच्या ठिकाणी बोलविले. तेथे दोघांना मारहाण करून डांबून ठेवले. नंतर रिक्षातून मृतदेह व जखमी चव्हाणला उंड्रीत सोडले.
दरम्यान जखमी अवस्थेतील चव्हाणने नागरिकांच्या मदतीने घरी फोन करून घडलेला प्रकार सांगितला. उपचारादरम्यान नागदिवेचा मृत्यू झाल्याचे घोषीत करण्यात आले. बालाजी चव्हाण यांचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कोंढवा पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील, गुन्हे निरीक्षक गोकुळ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक स्वराज पाटील करीत आहेत.
हे ही वाचा :