सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा : निरा-बारामती मार्गावरील करंजेपूल तसेच वाणेवाडी येथील निरा डाव्या कालव्यावरील पुलांची काम गेल्या वर्षभरापासून रखडली असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या पुलांच्या अर्धवट राहिलेल्या कामाला मुहूर्त कधी मिळणार, असा संतप्त सवाल या मार्गावर प्रवास करणार्या प्रवाशांसह वाहनचालकांनी विचारला आहे. पूल परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीचे साम—ाज्य पसरले असून, येथून प्रवास करणे जिकरीचे ठरत आहे. दोन्ही पुलावर सायंकाळच्या वेळी उसाच्या बैलगाड्या आणि ट्रॅक्टर-ट्रक चालकांची कसरत सुरू आहे. धोकादायक पद्धतीने पुलांवरून वाहतूक सुरू असून, मोठा अपघात झाल्यानंतरच ठेकेदाराला जाग येणार आहे का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
निरा मार्गावरील निंबुत, करंजेपूल, वाणेवाडी येथे निरा डावा कालव्यावरील आणि ओढ्यांवर नव्याने पुलांची कामे सुरु झाली. निंबुतच्या पुलाचे काम पुर्ण झाले. मात्र वाणेवाडी आणि करंजेपुल येथील पुलांचे काम अजूनही पुर्ण झाले नाही. परिणामी, वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. दोन्हीही पुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. एखादा मोठा अपघात घडल्यानंतरच पुलाचे काम पूर्ण होणार आहे का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. दोन्हीही पुलांची कामे अर्धवट राहिल्याने या मार्गावरील वाहतूक खिळखिळी झाली आहे. पुलावरून एकाच बाजूने धोकादायक वाहतूक सुरू आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी मिळूनही कामे वेळेत होत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोमेश्वर साखर कारखान्याचा हंगाम सुरु असल्याने ऊस वाहतूक करणार्या वाहनांना याठिकाणी प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत आहे. कारण नसताना येथील फुलांची उंची मोठी केल्याने वाहनचालकांची जीवघेणी कसरत सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे डोळेझाक करत असल्याने सायंकाळच्या वेळी निरा रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.