पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : ऐतिहासिक नाटकांची प्रेक्षक वाट पाहतो. मात्र, इतिहासाचा विपर्यास करणे, इतिहास सोयीने दाखवणे आणि काही खलप्रवृत्तीचे उदात्तीकरण करणे थांबवणे गरजेचे आहे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी (दि. 6) व्यक्त केले. नाटककार वसंत कानेटकर यांचे 'रायगडाला जेव्हा जाग येते' या नाटकावर त्यांनी याप्रसंगी अप्रत्यक्ष टीकाही केली. पिंपरी-चिंचवड येथे आयोजित शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी पवार बोलत होते. ते म्हणाले, हे नाटक महाराजांच्या कौटुंबिक बाबींवर अधिक भाष्य करते. परंतु महाराज अधिक हतबल झालेले दाखवले असे भासते.
'रायगडाला जेव्हा जाग येते' या नाटकात जाग म्हणजे 'उभारी' असा अर्थ अभिप्रेत आहे. मात्र त्यामध्ये महाराजांचे शल्य अधिक दाखवले आहे. मी हे नाटक दिल्लीत पाहिले. सध्याचे प्रेक्षक कुटुंब कलहातील महाराज का दाखवले असा प्रश्न विचारतील आणि पुरावेही मागतील.
पवार म्हणाले, 'मराठी नाट्यसृष्टी नवे, प्रयोगशील आणि सर्जनशील विषय घेऊन पुढे येत आहे. नाटक हे चित्रपटांसमोर कसे टिकणार, हा सध्या मोठा प्रश्न आहे.
मला अचानक अध्यक्षपद मिळाल्याने अचानक मुख्यमंत्रिपद मिळाल्यासारखे वाटत आहे, अशी शाब्दिक कोटी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच त्यांनी ही कोटी केल्याने सभागृहात हास्याची खसखस पिकली.
हेही वाचा