कडाक्याच्या थंडीमुळे शेकोट्या पेटवून ऊसतोडणी
पारगाव : पुढारी वृत्तसेवा : कडाक्याच्या थंडीमुळे ऊसतोड कामगार हैराण झाले आहेत. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात ऊसशेतातच शेकोट्या पेटवून ऊसतोड सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील भीमाशंकर कारखाना परिसर, पारगाव, शिंगवे, काठापूर, रांजणी, वळती, नागापूर, थोरांदळे आदी गावांमध्ये ऊसतोड वेगात सुरू आहे.
यंदा या परिसरात थंडी वाढली आहे. मागील दीड महिन्यापासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. ऊसतोड कामगार हे भल्या पहाटेच अंधार असतानाच ऊसतोड सुरू करतात. थंडीचे प्रमाण अधिक असल्याने सकाळ होईपर्यंत ते शेतातच उसाचे पाचट वापरून शेकोट्या पेटवतात. यंदाचा हिवाळा त्रासदायक असल्याचे ऊसतोड कामगार सांगत आहेत.