बदलत्या हवामानाचा सीताफळाला फटका | पुढारी

बदलत्या हवामानाचा सीताफळाला फटका

न्हावरे : पुढारी वृत्तसेवा :  सध्याच्या बदलत्या हवामानामुळे शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील न्हावरे परिसरातील शेतकर्‍यांची सीताफळाची शेती तोट्यात येऊन शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला आहे. संबंधित विमा कंपनीने याची दखल घेऊन नुकसानभरपाई द्यावी तसेच या पिकाला शासनाने अनुदान जाहीर करावे, अशी मागणी शेतकरी दीपक कोकडे यांनी केली आहे.
गेली अनेक वर्षांपासून शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात सीताफळ बागांमध्ये वाढ झाली आहे. सीताफळाला मध्यम व पोषक हवामान आवश्यक असते. शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात सीताफळाला अनुकूल परिस्थिती आणि चांगला बाजारभाव मिळत आहे. कांदा पिकाला दर नसल्याने न्हावरे परिसरातील शेतकरी या सीताफळ लागवडीकडे वळले आहेत. या भागात ठिकठिकाणी सीताफळाची शेती पाहावयास मिळत आहे.

बुरशी व पिठ्या ढेकूणचा प्रादुर्भाव
सीताफळाला सप्टेंबर ते ऑक्टोबरपर्यंत चांगला बाजारभाव मिळतो. परंतु सततच्या वातावरण बदलामुळे सीताफळावर बुरशी व पिठ्या ढेकूण यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव जाणवल्याने अनेक महागड्या फवारणी करूनही फळाचा आकार कमी झाला. काही सीताफळे काळी पडली आहेत. पर्यायाने बाजारपेठेत मागणी कमी झाल्याने शेतकर्‍यांना याचा आर्थिक भुर्दंड बसला आहे. सततच्या वातावरण बदलामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. विमा कंपनीने नुकसानभरपाई द्यावी व शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी न्हावरे परिसरातील शेतकर्‍यांकडून होत आहे.

Back to top button