आगामी काळात पाणीबाणी? खडकवासलात गतवर्षीपेक्षा 11 टक्के कमी पाणी | पुढारी

आगामी काळात पाणीबाणी? खडकवासलात गतवर्षीपेक्षा 11 टक्के कमी पाणी

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : खडकवासला धरण साखळीत गतवर्षीच्या तुलनेत जवळपास 11 टक्के कमी पाणीसाठा आहे. शुक्रवारी (दि. 29) दिवसअखेर खडकवासला साखळीत 21.71 टीएमसी म्हणजे 74.49 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. गेल्या वर्षी आजच्या दिवशी 29 डिसेंबर 2022 रोजी धरण साखळीत 25.04 टीएमसी म्हणजे 85.90 टक्के पाणीसाठा होता. राज्यातील इतर मोठ्या धरणांच्या तुलनेत खडकवासलात समाधानकारक पाणीसाठा आहे. असे असले तरी नवीन वर्षात प्रशासनासमोर काटकसरीचे आव्हान उभे आहे.
पाण्याची तूट भरून काढण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. पाणीटंचाईची झळ बसणार नाही यासाठी पाण्याची बचत, गळती यावर लक्ष केंद्रित केले आहे. सध्या पुणे शहर व परिसराला पिण्यासह पुरेसे पाणी सोडले जात आहे तसेच शेतीला रब्बी आवर्तन सोडण्यात आले आहे.

सध्या सुरू असलेल्या रब्बी आवर्तनाचा लाभ हवेली, दौंड, इंदापूरसह जिल्ह्यातील 66 हजार हेक्टर शेतीला होत आहे. 1054 क्युसेकने खडकवासलातून मुठा कालव्यात विसर्ग सुरू आहे. जानेवारीअखेरपर्यंत सहा ते साडेसहा टीएमसी पाणी शेतीला मिळणार आहे. पिण्यासाठी तसेच रब्बी आवर्तनासाठी पाणी सोडण्यात येत असल्याने पानशेत, वरसगाव व टेमघर या तिन्ही धरणांतून खडकवासलात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे वरील तिन्ही धरणांतील पाण्याची पातळी कमी होत आहे. शुक्रवारी दिवसअखेर पानशेतमध्ये 88.14 टक्के, वरसगावमध्ये 77.56 व टेमघरमध्ये 29.44 टक्के पाणी शिल्लक होते. तर खडकवासलात 65.48 टक्के साठा आहे.

जानेवारी अखेरपर्यंत रब्बी आवर्तन
खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे म्हणाले, जानेवारीअखेरपर्यंत रब्बी आवर्तनाचे पाणी सोडण्यात येणार आहे. त्यानंतर उन्हाळी आवर्तनाचा निर्णय मार्च महिन्यात कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत होणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणी असल्याने पाणी बचतीसाठी महापालिका तसेच संबंधित विभागाला सूचना दिल्या आहेत.

Back to top button