

लोणी-धामणी : पुढारी वृत्तसेवा : बटाट्याचे बाजारभाव गडगडल्याने बटाटा काढणीवाचून शेतातच आहे. त्यामुळे आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील बटाटा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. निरगुडसर, मेंगडेवाडी, जारकरवाडी, पोंदेवाडी, लाखणगाव, धामणी, खडकवाडी, वाळुंजनगर, लोणी आदी गावांमध्ये बटाटा पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात आले आहे. ज्या शेतकर्यांनी आघाध बटाटा लागवड केली आहे अशा शेतकर्यांची बटाटा काढणीची लगबग जोरात सुरू आहे, तर ज्या शेतकर्यांनी उशिरा बटाटालागवड केली अशा शेतकर्यांचा बटाटा काढणीला आला आहे.
मात्र, चालू हंगामात लहरी हवामानामुळे बटाट्याचे उत्पादन (गळीत) कमी-अधिक प्रमाणात निघत असल्याने शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. काही किरकोळ, घाऊक व्यापारी काढलेला बटाटा शेतातच विकत घेत आहेत. त्यात बटाटा काढण्यासाठी मजुरांची वानवा जाणवत असल्याने जादा पैसे देऊन मजूर परगावाहून वाहनांची व्यवस्था करून आणावे लागत आहेत. त्यामुळे शेतकर्यांची मोठी दमछाक होत आहे, असे निरगुडसर येथील बटाटा उत्पादक शेतकरी बाळासाहेब येवले यांनी सांगितले. सध्या बटाट्याला किलोमागे 10 ते 15 रुपयांचा भाव मिळत आहे. त्यामुळे काढणीला आलेला बटाटा काढणीवाचून शेतातच आहे. आज ना उद्या बाजारभाव वाढेल या आशेवर बटाटा आज काढू उद्या काढू, अशी चालढकल शेतकरी करीत आहेत. बटाटा काढून कांद्यासारखा शेतात आठ-आठ दिवस ठेवता येत नाही, असे बटाटा उत्पादक शेतकरी संतोष येवले यांनी सांगितले.