पर्यटकांचा उन्माद ! सिंहगड घाट रस्त्यावर वाहतूक कोंडी | पुढारी

पर्यटकांचा उन्माद ! सिंहगड घाट रस्त्यावर वाहतूक कोंडी

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा :  गेल्या आठवड्याप्रमाणे आजही (दि. 10) सिंहगड किल्ल्याच्या मोरदरी खिंडीतील अरुंद रस्त्यावर पर्यटकांनी वाहने उभी केल्याने वाहतूक कोलमडली. तर दुसरीकडे राजगड किल्ल्यावर येणारे पर्यटक गडावरच पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्यांचा कचरा फेकून पसार होत आहेत. त्यामुळे गडावर कचरा साचल्याचे चित्र दिसून आहे. घाटात ठिकठिकाणी वाहने उभी करून मौजमजा करणार्‍या उन्मत पर्यटकांपुढे वन विभाग हतबल झाल्याचे चित्र पुढे आले आहे. घाटरस्त्यावरील वाहतुकीचा बोजवारा उडाल्याने वन अधिकार्‍यांसह सुरक्षारक्षकांना धावपळ करावी लागली.

सिंहगड वन विभागाचे वन परिमंडल अधिकारी समाधान पाटील म्हणाले की, घाटरस्त्यावर वाहतूक नियंत्रण करण्यासाठी सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. मात्र, वाहतूक सुरळीत करण्यासाठी सुरक्षारक्षक पुढे गेल्यावर पर्यटक जागा मिळेल तिथे वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.

दिवसभरात गडावर 578 चारचाकी व 1610 दुचाकी अशी एकूण 2188 वाहने आल्याची नोंद झाली. तसेच पर्यटकांकडून 1 लाख 38 हजार 300 रुपयांचा टोल वसूल करण्यात आला. त्यामुळे गडावरील वाहनतळ दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हाऊसफुल्ल झाला. त्यामुळे वाहनतळापासून घाटरस्त्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. खडकवासला धरणाच्या चौपाटीवर खाजगी सुरक्षारक्षकांसह हवेली पोलिस तळ ठोकून होते. त्यामुळे चौपाटीवर मोठ्या संख्येने पर्यटकांनी गर्दी करूनही पुणे- पानशेत रस्त्यावरील वाहतुकीचा बोजवारा उडाला नाही.

रराजगड किल्ल्यावर दिवसभरात चार ते पाच हजारावर पर्यटकांनी हजेरी लावली. अलिकडच्या काळात गडावर मोठ्या संख्येने येणार्‍या पर्यटकांमुळे गडावरील कचर्‍याची समस्या गंभीर बनली आहे. गडाच्या चोर दरवाजा, पाल दरवाजा तसेच संजीवनी माचीच्या तटबंदीखालील भागात पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, प्लॅस्टिक कचर्‍याचे ढीग पसरले आहे, त्यामुळे वनसंपदा विद्रूप दिसत आहे.

Back to top button