मोरगाव : पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील मोरगाव-निरा रस्त्यावरील अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागल्याने हा रस्ता अपघातप्रवण बनू लागला आहे. वाढते अपघात लक्षात घेता या रस्त्यावर सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणार्या वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्यावरील धोकादायक वळणावर गतिरोधक किंवा धोकादायक वळण असल्याबाबतचे फलक लावलेले नाहीत.
त्यामुळे या वळणाचा अंदाज न आल्याने येथे सातत्याने अपघात होत आहेत. दोन दिवसांपूर्वी याच वळणावर दुचाकीस्वाराचा अपघात झाला होता. ग्रामस्थांच्या प्रसंगावधानाने त्याला वेळेत उपचार मिळाल्याने त्याला जीवदान मिळाले. तसेच याच ठिकाणी एका मालमोटारीचाही अपघात घडला होता. या रस्त्यावरील धोकादायक वळणावर साइडपट्ट्या नसल्याने अपघातांमध्ये वाढ झाली आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे या अपघातांकडे दुर्लक्ष होत आहे. अपघातांना जबाबदार असलेल्या अधिकार्यांसह संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
हेही वाचा :