पुणे जिल्ह्यात लोकसहभागातून 17 वनराई बंधारे तयार | पुढारी

पुणे जिल्ह्यात लोकसहभागातून 17 वनराई बंधारे तयार

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  कृषी विभागाने लोकसहभागातून व श्रमदानातून जिल्ह्यात 1 हजार 147 वनराई बंधारे बांधले आहेत. ओढे, नाल्यांमधून वाहून जाणारे पाणी अडवून रब्बी हंगामातील पिके आणि फळबागांना संरक्षित सिंचन उपलब्ध करण्यास यश आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागामार्फत तालुकानिहाय नियोजन करण्यात आले. क्षेत्रीयस्तरावरील अधिकारी, कर्मचार्‍यांनी लोकांचा सहभाग वाढवून श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्यासाठी रोटरी क्लब सदस्यांसह शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थी, सेवाभावी संस्था, व्यापारी मंडळे, गणेश मंडळे, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषी सेवा केंद्राच्या सहकार्याने जिल्ह्यात यशस्वी मोहीम राबविली.

बंधारे बांधण्यासाठी आवश्यक रिकाम्या बॅग्ज उपलब्ध करून रोटरी क्लबने मोठे योगदान दिले. सिमेंटच्या रिकाम्या गोण्यांमध्ये रेती, वाळू भरून पाणी अडविण्यात आले. साठलेल्या पाण्याचा उपयोग जनावरांना होण्याबरोबर रब्बी हंगामातील पिके, भाजीपाला आणि फळपिकांना होत आहे. सुमारे एक हजार हेक्टरवरील पिकांना सिंचनाची सोय उपलब्ध झाल्याचे काचोळे यांनी सांगितले.

पुरंदरमध्ये सर्वाधिक 252 बंधारे…
जिल्ह्यात सर्वाधिक 252 वनराई बंधारे हे पुरंदर तालुक्यात उभारण्यात आले आहेत. तसेच तालुकानिहाय स्थिती पाहता भोर 94, वेल्हा 127, मुळशी 107, मावळ 89, हवेली 35, खेड 61, आंबेगांव 115, जुन्नर 46, शिरूर 103, बारामती 17, दौंड 81, इंदापूर 20 बंधार्‍यांचा समावेश आहे.

 

Back to top button