चिंता वाढली ! अत्यल्प पावसामुळे जिरायती भागात पाणीपातळी घटली | पुढारी

चिंता वाढली ! अत्यल्प पावसामुळे जिरायती भागात पाणीपातळी घटली

सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यात चालू वर्षी अत्यल्प पावसाने शेतकर्‍यांची काळजी वाढवली आहे. वरुणराजा बरसला नसल्याने शेतकर्‍यांसह सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढली आहे. जिरायती भागातील विहिरींच्या पाणीपातळीत घट होऊ लागली आहे. डिसेंबर महिन्यातच पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, चालू वर्षी शेतकर्‍यांना दुष्काळाशी दोन हात करावे लागणार आहेत. दर वर्षी सोमयाचे तळे जून-जुलैमध्ये निम्मे, तर ऑगस्टमध्ये संपूर्ण भरते. या पाण्याचा वापर परिसरातील ग्रामस्थांना वापरण्यासाठी तसेच जनावरांच्या पाण्यासाठी व शेतीसाठी होत असतो. दरवर्षी ओव्हरफ्लो होणारे हे तळे उन्हाळ्यात शेतकर्‍यांसाठी फायदेशीर ठरते. चालू वर्षी मात्र पावसाअभावी हे तळे कोरडेच आहे.

सोमेश्वर कारखान्यापासून पाच-दहा किलोमीटर अंतर असलेल्या सोमेश्वर मंदिर, चौधरवाडी, जोशीवाडी, रासकरमळा, देऊळवाडी परिसरात शेतकर्‍यांनी केलेल्या ज्वारी पिकांना पुरेशे पाणी देणेही शेतकर्‍यांना शक्य झाले आहे. काही शेतकर्‍यांनी निरा डाव्या कालव्यावरून जलवाहिनी नेली असल्याने त्यांची सोय झाली आहे. समाधानकारक पाऊस झाला नसल्याने चालू वर्षी बारामतीच्या पश्चिम भागातील विहिरी आणि कूपनलिकांची पाण्याची पातळी ऐन डिसेंबर महिन्यातच कमी होऊ लागली आहे. त्यामुळे शेतीला पाण्याची टंचाई जाणवत आहे. उपलब्ध पाण्यावर शेतीची तहान भागवली जात आहे. सोमेश्वर परिसराला वरदान ठरलेल्या निरा डावा कालव्याचे आवर्तन
सुरू झाल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे, तर पावसाअभावी या भागातील तळी, विहिरी, ओढे, नाले, चार्‍या नसल्याने कोरड्या पडल्या आहेत.

हेही वाचा :

Back to top button