अन् उलगडली महिलांच्या शौर्याची कहाणी ! | पुढारी

अन् उलगडली महिलांच्या शौर्याची कहाणी !

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भारताच्या इतिहासातील देदीप्यमान विजयांमागील लष्कराच्या तिन्ही दलांप्रमाणेच नागरी सहभागाचे विलक्षण कथन विंग कमांडर (निवृत्त) लक्ष्मण कर्णिक यांनी शनिवारी ऐकवले, तेव्हा श्रोत्यांमधील सारेच भारावून गेले. 1971 च्या युद्धात भूज येथे पाकिस्तानी हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात लष्कराच्या धावपट्टीचे झालेले नुकसान, कमी कालावधीत बॉम्बफेक सुरू असताना, ज्या धैर्याने स्थानिक महिलांनी धावपट्टीची दुरुस्ती केली त्या वीरांगनांना सार्‍या सभागृहाने टाळ्यांच्या कडकडाटात मानवंदना दिली.
भाषा फाउंडेशनच्या वतीने आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर व गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था यांच्या सहकार्याने आयोजित कथायात्रेमध्ये झालेल्या ‘सीमेवरच्या पराक्रमगाथा’ या विषयावरील सत्रात लष्करी सेवेतील अधिकार्‍यांनी उपस्थितांशी संवाद साधला. फाउंडेशनच्या अध्यक्षा स्वाती राजे, जयदीप राजे उपस्थित होते.

कर्णिक म्हणाले, भूज येथील हवाई दलाच्या विमानतळाच्या धावपट्टीचे बॉम्बहल्ल्यात नुकसान झाले होते. कमीतकमी वेळेत धावपट्टी पूर्ववत करणे गरजेचे होते. अशावेळी भूजपासून 10 किलोमीटर अंतरावरील माधोपूर या गावातील सुमारे 250 महिलांनी व काही पुरुषांनी भारतीय लष्कराला मदतीचे आश्वासन दिले. आसपास बॉम्बफेक होत असतानाही, या वीरांगना धावपट्टीची दुरुस्ती करण्यासाठी अथक योगदान देत राहिल्या. ठरल्या वेळात त्यांनी धावपट्टीची दुरुस्ती पूर्ण केली. भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 75 चे सदस्य असलेले कमांडर पराग तिवारी यांनी समुद्रकिनार्‍याच्या सुरक्षेविषयीची माहिती दिली. नौदलाच्या अंतर्गत कार्यरत असणार्‍या लष्कराच्या आस्थापना सागरी सीमांचे रक्षण, देखभाल करतात, त्यांना विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या आणि राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्लिष्ट भू – राजकीय आव्हानांचा सामना करावा लागतो. ‘26-11’ च्या घटनेनंतर नौदलाने केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध प्रकारची सुरक्षा यंत्रणा नव्याने विकसित केली आहे आणि मोठ्या प्रमाणात गस्त वाढवण्यात आली आहे. तसेच गुप्तहेर यंत्रणेमार्फत योग्य माहिती मिळवण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (बीआरओ) एस अ‍ॅण्ड सी विभागाचे कमांडंट नवीन अहलावत यांनी देशाच्या सीमावर्ती व अत्यंत दुर्गम भागातील रस्ते बांधणीची माहिती या वेळी उपस्थितांना दिली. लडाखसारख्या अत्यंत कठीण हवामानाचा सामना करणार्‍या भागात नेहमीपेक्षा 40 दिवस अधिक तेथील पास सुरू ठेवण्यात बीआरओने यश मिळवल्याने विषम काळात दळणवळणावर येणार्‍या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होत आहे, अशी माहिती अहलावत यांनी दिली. रिअर अ‍ॅडमिरल आशिष कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

Back to top button