मुंढवा : पुढारी वृत्तसेवा : मुख्य रस्त्यांवरील पदपथांची दुरवस्था झाल्याने नागरिकांना चालताना कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणच्या पदपथांची दुरुस्ती मागील दोन-तीन वर्षांपासून झाली नाही, त्यामुळे महापालिकेच्या पथ विभागाचा निधी नक्की कुठे खर्च होतो? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. मुंढवा येथील पासपोर्ट कार्यालयाच्याविरुध्द बाजूच्या रस्त्यावरील पदपथ उखडला आहे. महिला व ज्येष्ठ नागरिकांची येथून ये-जा करताना गैरसोय होते. येथील उखडलेल्या पदपथांमुळे अनेकदा नागरिक घसरून पडले आहेत. येथील पदपथ दुरुस्तीची मागणी करूनही पालिका याकडे दुर्लक्ष करीत आहे.
भारत फोर्ज कंपनीपाठीमागील रेल्वे उड्डाणपूल ते जहांगीर चौक या मुख्य रस्त्यावरील पदपथाची मागील पाच वर्षांपासून कसलीच दुरस्ती झालेली नाही. दिवसेंदिवस हे पदपथ आणखीनच नादुरुस्त होत आहे. याविषयी नागरिकांनी महापालिकेकडे विचारणा केली, तर चालढकल करणारी उत्तरे मिळत असल्याचे नागरिकांनी सांगितले. कोरेगाव पार्क येथील नॉर्थ मेन रोडच्या दोन्ही बाजूंना असलेले पदपथ अनेक ठिकाणी नादुरुस्त झाले आहे. हा रस्ता अरुंद आहे. या रस्त्यावर दिवस-रात्र वाहनांची वर्दळ असल्याने नागरिकांना पदपथावरूनच चालावे लागते. येथील पदपथच नादुरुस्त असल्याने चालायचे कोठून, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
कोरेगाव पार्क परिसरात अनेक ठिकाणी पदपथ नादुरुस्त आहेत. पदपथांच्या दुरुस्तीविषयी वेळोवेळी मागणी करूनही महापालिका याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे पथ विभागाचा निधी नक्की कुठे खर्च केला जातो, याचे उत्तर महापालिकेने नागरिकांना दिले पाहिजे.
– अभिजित वाघचौरे, रहिवासी, कोरेगाव पार्क
हेही वाचा