Pune : अवकाळी पावसाने शेकडो एकर ऊस भुईसपाट | पुढारी

Pune : अवकाळी पावसाने शेकडो एकर ऊस भुईसपाट

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा :  रविवारी (दि. 26) झालेल्या अवकाळी पावसामुळे ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जुन्नर तालुक्यामध्ये शेकडो एकर ऊस भुईसपाट झाला असून, हा भुईसपाट झालेला ऊस साखर कारखान्यांनी तत्काळ तोडून द्यावा, अशी मागणी संबंधित शेतकर्‍यांनी केली आहे. पडलेला ऊस जर वेळेत तोडला नाही तर त्याला उंदीर लागू शकतो आणि पर्यायाने उसाचे वजन घटू शकते. तसेच त्या उसाला पांगशी फुटण्याची सुद्धा भीती व्यक्त होत आहे. यंदाच्या वर्षी अद्याप उसाला तुरे आलेले दिसत नाही, तथापि एक-दोन महिन्याच्या फरकाने पुन्हा उसाला तुरे येऊन उसाचे वजन घटण्याची भीती ऊस उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत.

जुन्नर तालुक्यामध्ये मागील वर्षी लागवड झालेले उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. साखर कारखाने सुरू असल्यामुळे सध्या आडसाली उसाची तोडणी सुरू आहे. बहुतांश शेतकरी आडसाली उसाची लागवड करण्याला प्राधान्य देत असतात. मागील वर्षी जुन्नर तालुक्यामध्ये आडसाली उसाची लागवड 3 हजार हेक्टरपेक्षा अधिक झालेली आहे. पैकी 800 ते 1 हजार हेक्टरपर्यंत तोडणी झालेली आहे. पूर्व हंगामी उसाची लागवड 856 हेक्टर असून सुरू उसाची लागवड 2 हजार 600 हेक्टर आहे. त्याचबरोबर खोडवादेखील मोठ्या प्रमाणात आहे. यंदाच्या नवीन लागवड हंगामामध्ये 4 हजार हेक्टर आडसाली उसाची लागवड झालेली आहे. यंदा पाऊस कमी असल्यामुळे पूर्व हंगामी ऊस लागवड मात्र अत्यल्प असून अवघी 200 हेक्टर लागवड झालेली आहे.

दरम्यान दोन दिवसापूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे ऊस जमीनदोस्त झाला आहे. वादळाने भुईसपाट झालेला ऊस तत्काळ तोडून न्यावा, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकर्‍यांची आहे.

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीची मदत करा : खासदार अमोल कोल्हे

रविवारी (दि. 26) झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना प्रारंभिक आर्थिक मदत करावी, तसेच कृषी व महसूल विभागाला पंचनामे करून मदतीचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. आधीच एकामागून एक येणार्‍या संकटांमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे.

त्यातच रविवारचा अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ऊस, द्राक्ष, बटाटा, कांद्यासह इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे शेतकर्‍यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. त्यामुळे पंचनामे तातडीने करून मदतीचे प्रस्ताव व्हायला हवेतच; मात्र पंचनाम्यांची प्रक्रिया होईपर्यंत न थांबता शेतकर्‍यांना प्रारंभिक नुकसानभरपाई देण्याची मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, शिरूर लोकसभा मतदारसंघातील आदिवासी भागातील अनेक शेतकर्‍यांनी पीकविमा काढलेला नाही. अशा परिस्थितीत त्यांच्या भातशेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने प्राथमिक पाहणी करून मदत करणे आवश्यक आहे. विमा कंपन्यांकडून शेतकर्‍यांची फसवणूक होणार नाही, याची दक्षताही राज्य सरकारने घ्यायला हवी, अशी अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली.

Back to top button