मंचर, कळंब परिसरात गारपीट ; अवकाळी पाऊस बरसल्याने मोठे नुकसान
मंचर : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यातील मंचर आणि कळंब परिसरात रविवारी (दि. 26) दुपारी अचानक वादळी वार्यासह गारपीट झाली. अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाले आहेत. द्राक्ष बागायतदार चिंताग्रस्त झाले असून द्राक्ष पिकांना
फटका बसण्याची शक्यता शेतीतज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. मंचर, कळंब, चांडोली परिसरात अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांचे तरकारी तसेच इतर पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासूनच या परिसरात ढगाळ वातावरण होते. पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. त्याचा प्रत्यय रविवार दुपारी तीन वाजता आला.
रविवारचा आठवडे बाजार मंचर येथे मोठ्या प्रमाणात भरतो. दुपारी अवकाळी आलेल्या जोरदार पावसामुळे बाजारकरूंची दैना झाली. तसेच मंचर बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या तरकारी पिकांचे काही प्रमाणात पावसामुळे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. सततच्या अवकाळी पावसामुळे येथून मागील काळातही शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी कांदा काढणी तसेच बटाटा काढणी सुरू आहे. त्याचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समजते. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकरी बांधव मोठ्या अडचणीत आले आहेत.