पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागाला अवकाळीने झोडपले | पुढारी

पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागाला अवकाळीने झोडपले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याच्या उत्तर भागातील आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील बेट भागाला रविवारी (दि. 26) दुपारच्या सुमारास मुसळधार पावसाने झोडपले. वादळी वारा, मुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट, यामुळे शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले. गहू, हरभरा, कांदा, तरकारी पिकांसह द्राक्ष, डाळिंब, भात आणि ऊस पिकाला या पावसाचा सर्वाधिक फटका बसला. या अवकाळीने शेतकर्‍यांचे आर्थिक गणित पुन्हा एकदा कोलमडले.  शिरूर तालुक्यातील बेट भागात रविवारी (दि. 26) दुपारी जोरदार वार्‍यासह गारांचा पाऊस झाला. यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. टाकळी हाजी, कवठे येमाई, फाकटे, निमगाव दुडे, माळवाडी, वडनेर, सविंदणे या गावांच्या परिसरात गारांचा जोरदार पाऊस झाला. रविवारी दुपारी पावणेचार वाजता ढगाळ वातावरण असताना अचानक गारांचा पाऊस सुरू झाला. काही काळ फक्त गारा पडल्यानंतर जोरदार वार्‍यासह पाऊस पडला. यामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

शेतातील पिकांना पानेच राहिली नाहीत, शिवाय जोरदार पावसामुळे पीक वाहून गेल्याने अनेकांचे पीकच नामशेष झाले. कांदा लागवडीचा हंगाम सुरू असून, या गारांच्या पावसामुळे बटाटा, कांद्याच्या रोपाचे, लागवड केलेल्या कांद्याचे, जनावरांचा चारा, भाजीपाला तसेच ऊस, सीताफळ, पेरू,डाळिंब पिकाचेही मोठे नुकसान झाल्याने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. वारा इतका जोराचा होता की, या वार्‍यात अनेक मोठी झाडे तसेच डाळिंबाच्या बागा कोलमडून पडल्या आहेत. काही ठिकाणी रस्त्यावर झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. टाकळी हाजी येथे आठवडा बाजारात व्यापार्‍यांची तारांबळ उडाली. काही ठिकाणी जनावरांच्या गोठ्याचे छप्पर उडून गेले तर अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले असून तारा तुटल्या आहेत. गारांमुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने गांभीर्याने दखल घेऊन त्वरित पंचनामे करावे, अशी मागणी टाकळी हाजीचे माजी सरपंच दामूशेठ घोडे, घोड व कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीचे सदस्य प्रकाश वायसे आणि वडनेरचे उपसरपंच विक्रम निचित यांनी केली आहे.

फाकटे-जांबूत वाहतूक काही काळ ठप्प
दरम्यान वार्‍याने फाकटे- जांबूत रस्त्यावर बाभळीचे झाड पडून वाहतूक ठप्प झाली होती. फाकटे येथील सामाजिक कार्यकर्ते शंकर पिंगळे, वैभव शेलार, प्रथमेश ढवळे, राजू शिंदे, गणेश बोराडे, अक्षय भालेकर यांनी तत्काळ जेसीबीच्या सहाय्याने रस्ता मोकळा करून दिला. चांडोह, जांबूत, पिंपरखेड, काठापूर या परिसरातही अवकाळी पावसाने हजेरी लावली.

वडगावपीर परिसरात तुफान गारपीट

वडगावपीर (ता. आंबेगाव) येथे रविवारी (दि. 26) दुपारी झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकर्‍यांच्या शेतातील उभी पिके भुईसपाट झाली असून, अनेक ठिकाणी बांध फुटून शेतातील माती वाहून गेली आहे. उभी पिके आडवी झाल्याने शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले असून, वडगावपीर येथे पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याचे शेतकरी सांगत आहे. रविवारी सकाळपासूनच हवेत थोडाफार उकाडा जाणवत होता. आंबेगाव तालुक्यातील पूर्वभागात असलेल्या वडगाव पीर येथे गारांचा तुफान पाऊस झाला. या गारांच्या पावसामुळे शेतकर्‍यांची शेतातील उभी पिके आडवी झाली आहेत. रब्बी हंगामात घेतली जाणारी गहू, ज्वारी, मका, हरभरा, कांद्याची रोपे पूर्णपणे शेतातच भुईसपाट झाली असून, अनेक ठिकाणी फळझाडे, ऊस आडवे झाले आहेत. आतापर्यंत वडगावपीर गावात इतक्या मोठ्या प्रमाणात गारपीट कधीच झाली नाही, असे स्थानिक शेतकरी योगेश आदक, नानासाहेब आदक यांनी सांगितले. रंगू आदक वस्ती येथे असलेल्या अनेक शेतकर्‍यांच्या शेताचे बांध फुटून माती वाहून गेली असून, एक केटी बंधाराही फुटला आहे. या पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, रब्बी हंगामातील सर्व पिके वाया गेले आहे. शासनाने याबाबत दखल घेऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून पंचनामे करावेत व शेतकर्‍यांना मदत करावी, अशी मागणी स्थानिक शेतकर्‍यांनी केली आहे.

अवसरी परिसरात वादळी वार्‍यासह गारपीट

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, गावडेवाडी या परिसरात रविवारी (दि. 26) दुपारी गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. पुणे-नाशिक रस्त्यावर अवसरी फाटा येथे अवसरी खुर्द येथील भैरवनाथ उत्सवानिमित्त भाविकांच्या स्वागतासाठी तात्पुरती उभारलेली लोखंडी स्वागत कमानही जमीनदोस्त झाली आहे. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही.
अवसरी खुर्द येथे वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस पडल्याने शेतकर्‍याची एकच तारांबळ उडाली. या पावसाने अनेक शेतकर्‍यांच्या तरकारी मालाचे नुकसान झाले असून, शेतकर्‍यांची उस, कडवळ, मका ही पिके भुईसपाट झाली आहेत. अवसरी फाटा येथील स्वागत कमान ट्रॅक्टरवर पडली असून, ट्रॅक्टरमध्ये कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. परंतु, वाहतूक अर्धा तास बंद होती.
दरम्यान, अचानक आलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी बटाटा काढणीस सुरुवात झाली असून, या पावसामुळे बटाटा पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच शेतात उभे असलेली कडवळ, मका, ऊस ही पिके भुईसपाट झाली आहेत.

कांदा, बटाटा पिकाला मोठा फटका

आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात रविवारी (दि. 26) दुपारी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. रविवारी (दि. 26) दुपारी मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसाचा फटका या परिसरातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांंना बसणार आहे. या भागात अनेक शेतकर्‍यांनी अगाप कांदा लागवडी केल्या. पुढील 15 दिवसांमध्ये हा कांदा काढणीला येणार आहे. या कांद्याला अवकाळी पावसाचा फटका मोठ्या प्रमाणावर बसणार असल्याची शक्यता शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. या भागात उन्हाळी कांद्याची रोपे अनेक शेतकर्‍यांनी टाकली आहेत. ही रोपे सध्या लागवडीसाठी तयार झाली आहेत. परंतु अवकाळी पावसाने ही रोपे झोडपल्याने

नागापूर परिसरातील ऊस भुईसपाट

नागापूर (ता. आंबेगाव) परिसरात रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे नागापूर परिसरातील पवारमळा, धनगरमाळीमळा, रिठेमळा परिसरातील ऊस पीक भुईसपाट झाले. परिणामी, अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वारे आणि मेघगर्जनेसह सुमारे 50 मिनिटे जोरदार पाऊस पडला. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका उसाच्या पिकाला बसला असल्याचे उस उत्पादक शेतकरी दगडू पवार यांनी सांगितले.अवकाळीमुळे नागापूर परिसरातील ऊस पिकाचे नुकसान झाल्याने महसूल विभागाने त्वरित पंचनामे करावेत, अशी मागणी माजी उपसरपंच सुनील शिंदे यांनी केली.

Back to top button