

बारामती : पुढारी वृत्तसेवा : राज्यात मराठा, धनगर व अन्य समाजाचा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. सरकारने त्यातून वेळीच मार्ग काढावा, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. बारामतीत एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले जात असल्याच्या प्रश्नावर पवार म्हणाले, आरक्षण हा गंभीर विषय झाला आहे. यासह अनेक विषय सध्या गंभीर स्थितीवर जाऊन पोहोचले आहेत. पक्षांतर बंदी कायद्याचे काय चालले आहे. मंत्रिमंडळात काय चालले आहे हे गंभीर प्रश्न आहेत. मात्र, आरक्षणाबाबत माझे स्पष्ट म्हणणे आहे की, सरकारने हा प्रश्न सोडवला पाहिजे.
संबंधित बातम्या :
माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2014 पूर्वी धनगर समाजाला कशाच्या आधारावर आश्वासन दिले होते, याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी करत चव्हाण म्हणाले, इतर आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वेळ मागितला आहे. इतर आरक्षणप्रश्नी त्यांनी शपथपूर्वक आश्वासन दिले असेल, तर त्याचा आदर करून वेळ दिला पाहिजे. एकीकडे मराठा आरक्षण, तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणावरून समाजात तीव्र भावना आहेत. याबाबत बोलताना चव्हाण म्हणाले की, यावर मी भाष्य करणार नाही. मात्र, आपल्या राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडता कामा नये. जो कोणी राजकीय नेता सामाजिक स्वास्थ बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते निंदनीय आहे. आपण खेळीमेळीने गुण्यागोविंदाने राहिले पाहिजे. हे प्रश्न कायदेशीर मार्गाने सोडवले पाहिजे. मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले होते. मात्र, सरकार गेल्यामुळे ते टिकवता आले नाही. माझी खात्री आहे की, आमचे सरकार असते, तर आरक्षण टिकवले असते. मात्र, सरकारला अधिकार नसताना देवेंद्र फडणवीस यांनी कायदा करून महाराष्ट्राच्या डोळ्यात धूळ फेकली की काय ? हा प्रश्न आहे. आज मुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन कोणत्या आधारावर आश्वासन दिलेले आहे. सामाजिक स्वास्थ कायम राहून हा प्रश्न कसा सोडवणार आहोत ? यासाठी वेळ दिला पाहिजे, असेही चव्हाण म्हणाले.
महाविकास आघाडीला मराठा आरक्षण टिकवता आले नाही, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपावर बोलताना चव्हाण म्हणाले की, यावर फार खोलात जायचं कारण नाही. मराठा आरक्षणासाठी सरकारला वेळ दिला पाहिजे. जेव्हा सरकार सांगेल आम्हाला जमलं नाही. जेव्हा नवीन वेळ येईल तेव्हा बघू. पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला चांगले यश मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला.
समाजात तेढ निर्माण होणारी वक्तव्ये नकोत
आरक्षणाच्या प्रश्नावरून ओबीसी व मराठा नेते एकमेकांवर टीका करत आहेत. याबाबत चव्हाण म्हणाले, समाजात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य होता कामा नये. आरक्षणाचा प्रश्न रस्त्यावर सुटणारा नाही. रस्त्यावर सोडवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल, तर महाराष्ट्राच्या दृष्टीने ते दुर्दैवी आहे. कायदेशीर मार्गाने हा प्रश्न सोडविला पाहिजे.
3 डिसेंबरनंतर भयावह परिस्थिती
आरक्षणावरून दोन समाजाला खेळवण्याचा कार्यक्रम केला जात आहे. त्याचे पर्यावसान 3 डिसेंबरनंतर राज्याची परिस्थिती भयावह होण्यात होईल, अशी भीती चव्हाण यांनी व्यक्त केली. दोन समाजाला भिडवण्याचे काम जे कोणी करत असेल त्याला जाब विचारला पाहिजे, असेही ते म्हणाले.