24 डिसेंबरला आपला विजय होणारच; मनोज जरांगे यांचा विश्वास | पुढारी

24 डिसेंबरला आपला विजय होणारच; मनोज जरांगे यांचा विश्वास

यवत/खोर : पुढारी वृत्तसेवा मागील 70 वर्षे आपल्या मराठ्यांच्या लेकरला सरकारने कुजविण्याचे काम केले आहे. मात्र, आपण सर्वजण एकजुटीने लढा हातात घेतला असून, त्याच्या विजयाचा दिवस जवळ आला आहे. येत्या 24 डिसेंबरला आपल्या लेकराचा विजय होणारच असल्याचा विश्वास मनोज जरांगे-पाटील यांनी व्यक्त केला.

राज्यातील तिसर्‍या टप्प्यातील सभा वरवंड (ता. दौंड) येथे पार पडली. या वेळी जरांगे-पाटील बोलत होते. मनोज जरांगे यांचे दौंड व वरवंड गावात जल्लोषात स्वागत करण्यात आले. दौंडमधील साखळी उपोषण करणार्‍यांमधील सहा जणांनी बेमुदत उपोषण केले होते. त्यांच्या हस्ते मनोज जरांगे यांचा सत्कार करण्यात आला. सरकारने मराठ्यांना 24 डिसेंबर रोजी ओबीसीमध्ये समाविष्ट करून आरक्षण दिले नाही तर 25 डिसेंबरला पुढची दिशा ठरवून सांगितले जाईल. 1 डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरू करा. आरक्षण हे निर्णयाच्या प्रक्रियेत आले आहे.

आरक्षण मिळाल्याशिवाय इंचभरही मागे हटणार नाही

केम : उजनी धरणाच्या सान्निध्यात मराठा आंदोलक पहाटे चार वाजता थंडीमध्ये शेकोटी करून माझी सभा ऐकतात. गरजवंत मराठा आरक्षणासाठीची ही ऐतिहासिक सभा कायम आठवणीत राहील, असे मत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी व्यक्त केले. मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय इंचभरही मागे हटणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला. वांगी नं. 1 (ता. करमाळा) येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. मराठा आरक्षणासाठी 24 डिसेंबरपर्यंतची मुदत आपण सरकारला दिली आहे. तोपर्यंत सरकार सरसकट कुणबी प्रमाणपत्रे देईल.

Back to top button