पुणे, पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यामध्ये लम्पीचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी सध्या सक्रिय जनावरांची संख्या 564 एवढी आहे. तर आत्तापर्यंत 270 जनावरांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. एकूण बाधित जनावरांची संख्या ही 6 हजार 554 एवढी झाली आहे. ऊस गाळप हंगाम सुरू झाल्याने इतर जिल्ह्यातून येणार्या जनावरांची संख्यादेखील ग्रामीण भागात वाढली आहे. साखर कारखान्यांवर असलेल्या जनावरांसाठी कारखाना प्रशासनाला खबरदारीच्या उपाययोजना घेण्याबाबत सूचना केल्या आहेत. तसेच स्वतंत्र डॉक्टरांची नियुक्ती करण्याचे देखील आदेश दिले आहेत. जिल्हा परिषदेकडून कारखान्यांवरील जनावरांचे देखील लसीकरण केले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे यांनी दिली. डॉ. विधाटे म्हणाले, लम्पीचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी सुट्टी न घेता काम करत आहेत, त्याला सध्या यश मिळताना दिसत आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात लम्पीचा प्रादुर्भाव दिसत असून, इंदापूर, खेड आणि बारामती तालुक्यात बाधा होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. मृत्यूचे प्रमाणदेखील बारामती आणि इंदापूरमध्ये अधिक आहे. सध्या 564 जनावरांवर उपचार सुरू असून, त्यापैकी 56 जनावरे ही गंभीर आहेत.
जिल्ह्यातील लम्पीचा मृत्यूदर कमी होत आहे. नवीन बाधित रुग्ण आढळण्याची संख्यादेखील काही प्रमाणात कमी झाली आहे. साखर कारखान्यांवरील जनावरांसाठी काळजी घेणे गरजेचे असल्याने कारखान्यांना त्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
डॉ. शिवाजी विधाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि.प.