लोणी-धामणी : पुढारी वृत्तसेवा : मांदळेवाडी (ता. आंबेगाव) येथील शिव ते कान्हुर मेसाई (ता. शिरूर) येथील खर्डे-शिंदे वस्ती या दरम्यानच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या रस्त्याने प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. गेली अनेक महिन्यांपासून या रस्त्यावरील डांबर उखडून गेले आहे. त्यामुळे या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पावसाचे पाणी साचून रस्त्याला डबक्याचे स्वरूप आले आहे. रस्त्यावरील साचलेल्या पाण्यातून ये-जा करताना खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. येथील विद्यार्थ्यांना या रस्त्याने प्रवास करताना कसरत करावी लागत आहे.
मांदळेवाडी ते खर्डे-शिंदे वस्ती हा साधारण दोन किलोमीटर अंतराचा रस्ता असून, हा आंबेगाव व शिरूर तालुक्याला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. मांदळेवाडी, वडगावपीर, लोणी परिसरातील अनेक युवक कामाधंद्यानिमित्त कान्हुर मेसाईमार्गे शिक्रापूर, रांजणगाव गणपती, सणसवाडी या ठिकाणी ये-जा करतात. तसेच कान्हुर मेसाई, रांजणगाव गणपती, शिक्रापूर, चिंचोली मोराची, हिवरे, पिंपळे जगताप या परिसरातील ग्रामस्थ कामानिमित्त भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, अवसरी खुर्द, मंचर, नारायणगाव या रस्त्याने ये-जा करतात. या सर्वांना या रस्त्यावरील खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित या रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बबन शिंदे, कान्हुर मेसाईचे माजी सरपंच बापू ननवरे, बंडू पूंडे व सोसायटी सचिव सुखदेव खर्डे व दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी केली आहे.
हे ही वाचा :